हजार फुटापर्यंत जमीन खचली : झाडे उन्मळून पडली : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
महेश तेली / गवाणे:
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुटाट घाडीवाडी येथील डोंगर खचला आहे. या डोंगर भागापासून सुमारे एक हजार फुटापर्यंत जमीन दुभंगली असून तेथील झाडेही उन्मळून पडली आहेत. या खचलेल्या डोंगराचा लोकवस्तीला कोणताही धोका पोहोचलेला नाही. मात्र, या खचलेल्या डोंगराचा धोका कायम असल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार कोकण भागात गेले दोन-तीन दिवस अतिवृष्टी सुरू आहे. याचा फटका जिल्हय़ातील अनेक भागांना बसला आहे. या अतिवृष्टीमध्ये वाऱयाचा वेग कमी असल्याने मोठय़ा नुकसानीच्या घटना घडलेल्या नाहीत. मात्र, अतिवृष्टीचा फटका काही भागांना बसला आहे. देवगड तालुक्यातील मुटाट-घाडीवाडी येथील लोकवस्तीपासून काही अंतरावर असलेला डेंगर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अतिवृष्टीमुळे खचला. डोंगराचा भाग सुमारे पाच ते सहा फूट खोल खचला असून डोंगर भागापासून सुमारे एक हजार फुटापर्यंत जमीन दुभंगली आहे. या खचलेल्या डोंगरानजीकच खासदार निधीतून बांधण्यात आलेली पाण्याची साठवण टाकी होती. या टाकीला सुदैवाने कोणताही धोका पोहोचलेला नाही. या घटनेची पाहणी भाजप कार्यकर्ते संजय घाडी यांनी केली. प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे घाडी यांनी सांगितले.