खानापूर / प्रतिनिधी
महामार्ग प्राधिकरणाने खानापूरहून मुडेवाडी, डुक्करवाडी, हत्तरगुंजी गावांना जाणाऱया रस्त्यावर भुयारी पुलाची सोय करावी, अशी मागणी तिन्ही गावच्या जनतेने केली आहे. या महामार्गाचे काम करत असताना सध्या अस्तित्वात असलेला रस्ता खोदण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने जेसीबी लावून काम सुरू केले होते. पण याची चाहूल लागताच तिन्ही गावातील प्रमुखांनी येऊन रस्ता खोदाईस सक्त विरोध केला. खोदलेला रस्ता पुन्हा लेव्हल करून घेतला. या ठिकाणी कमीत कमी एक ट्रक्टर जाईल इतका भुयारी पूल करावा. अन्यथा आम्ही या ठिकाणी कामच करू देणार नाही, असा इशाराही तिन्ही गावच्या जनतेने दिला आहे.
बेळगाव-पणजी महामार्गात या रस्त्यावर भुयारी पुलाची गरज असतानाही त्या ठिकाणी त्याची तरतूद केली नाही. यामुळे सहा महिन्यांपूर्वी तिन्ही गावच्या जनतेने महामार्ग प्राधिकरण तसेच खासदार अनंतकुमार हेगडे, आमदार अंजली निंबाळकर यांना निवेदन दिले होते. त्यावेळी या ठिकाणी भुयारी पुलाची तरतूद करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. आणि तो मार्ग सोडून पुढचे कामही सुरू करण्यात आले. पण अचानकपणे पुन्हा सध्या असलेला रस्ता खोदण्यास प्रारंभ झाला. त्यावेळी तिन्ही गावच्या प्रमुखांनी येऊन महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांना जाब विचारला. त्यावेळी त्यांनी खानापूर-पारिश्वाड रस्त्याला असलेल्या भुयारी पुलाकडून या तिन्ही गावांसाठी सर्व्हिस रोड होणार असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. पण आम्हाला सर्व्हिस रोड गैरसोयीचा असल्याने सध्या असलेला मार्गच आम्हाला उपयोगी असून त्या ठिकाणी कमीत कमी एक ट्रक्टर जाऊ शकेल, इतकाच रुंदीचा व उंचीचा भुयारी पूल करावा, तोपर्यंत या ठिकाणी आम्ही कामच करू देणार नाही, अशी स्पष्ट ताकीद त्या गावच्या लोकांनी दिली. रस्ता खोदाईचे काम बंद करण्यास महामार्ग प्राधिकरणाच्या त्या कंत्राटदाराला भाग पाडले.
यावेळी प्रवीण अगणोजी, भैरू मुतगेकर, शाहू अगणोजी, रवि मादार, तुकाराम अल्लोळकर, जोतिबा अल्लोळकर यासह तिन्ही गावांतील नागरिक उपस्थित होते.