31 मार्चला मुदत संपत असल्याने पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेचा महसूल वाढविण्यासाठी ठिकठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. मात्र, यापूर्वी 12 वर्षांच्या कराराने भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या गाळय़ांची मुदत संपत आली आहे. 31 मार्च रोजी ही मुदत संपत असल्याने पुन्हा भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यामध्ये पूर्वीच्या भाडेकरूंना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असल्याचे प्रकटन महापालिकेने प्रसिद्ध केले आहे.
मनपाच्या खुल्या जागांमध्ये व्यापारी संकुलांची उभारणी करून गाळे निर्माण केले आहेत. काही ठिकाणी खुल्या जागा भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. 440 गाळे असून, यापैकी बहुतांश गाळे 12 वर्षांच्या कराराने 2009 मध्ये लिलाव प्रक्रिया राबवून भाडेतत्त्वावर दिले होते. सदर गाळय़ांची मुदत मार्च 2022 ला संपत आहे. शासनाने घातलेल्या नियमावलीनुसार भाडे कराराची मुदत संपण्यापूर्वी तीन महिने आधी लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
यापूर्वी भाडे कराराने घेतलेल्या भाडेकरूंना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याकरिता भाडेकरूंना महापालिकेला याबाबतचे पत्र सादर करणे बंधनकारक आहे. जर भाडेकरूंना भाडय़ाची रक्कम मान्य नसल्यास किंवा लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्यास मार्च अखेरपर्यंत गाळे रिकामी करून द्यावे लागणार आहे. तसेच वेळेत गाळे रिकामी न केल्यास 1 महिन्याची वाढीव मुदत देण्यात येईल, पण त्याकरिता नवीन भाडे करारानुसार रक्कम भरावी लागेल.
सध्याच्या भाडेकरूंनी वाढीव भाडे करारासाठी पत्र न दिल्यास त्या गाळय़ाचा लिलाव करण्यात येणार असल्याचे प्रकटनात प्रसिद्ध करण्यात आले आहे. ज्या भाडेकरूंनी भाडय़ाची रक्कम अद्याप भरली नाही त्यांनी 7 दिवसांच्या आत भाडय़ाची रक्कम भरावी असे जाहीर करण्यात आले आहे. गाळय़ांचा लिलावाची तारीख व वेळ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महापालिका गाळे भाडेतत्त्वावर देण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबविणार आहे.