विजय सरदेसाई यांचा मंत्री माविन गुदिन्होंवर पलटवार : वेगळी आकडेवारी मांडून दाखवा, राज्य सरकार व मुख्यमंत्री नापास ठरल्याचेच सिद्ध
प्रतिनिधी /मडगाव
नीती आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे आपण वस्तुस्थिती आणि आकडेवारी यावर बोट ठेवून गोव्याचे सरकार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत कसे नापास ठरले आहेत हे मुद्देसुदपणे मांडून टीका केली होती. त्यावर मंत्री माविन गुदिन्हो यांनी पत्रकार परिषद घेऊन एकाही मुद्याला वा आकडेवारीला विचारात घेऊन बाजू मांडण्याचे प्रयत्न केले नाहीत. आपण जे मांडले होते ते सत्य होते व भाजपाने आपल्यावर कोणतेही आरोप केले म्हणून वस्तुस्थिती बदलत नाही. गोवा सरकार व मुख्यमंत्री नापास ठरले हेच त्यातून सिद्ध होत असल्याने ‘डबल इंजिन’ सरकारच्या राज्यातील इंजिनाच्या नापास चालकाला बदलणे आवश्यक आहे, असा पलटवार गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.
आपल्या मडगावातील कार्यालयातून जारी केलेल्या व्हिडीओत सरदेसाई यांनी मंत्री गुदिन्हो यांच्यावर निशाणा साधला आहे. नीती आयोगाची आकडेवारी चुकीची आहे हे भाजप प्रवक्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगावे. खरी आकडेवारी काय आहे ती मांडा. परंतु ते तसे करत नाहीत. कारण त्यांच्याकडे आकडेवारीच नाही. शनिवारी ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना चला आणि तोंडसुख घ्या एवढेच सांगण्यात आले होते, अशी टीका सरदेसाई यांनी केली. आपण मंत्रिमंडळात येण्यास उत्सुक होतो की आहे हा मुद्दा नसून केंद्रातील इंजिनने गोमंतकीय जनतेला उघडपणे दाखवून दिले आहे की, राज्यातील इंजिन नापास ठरले आहे आणि त्याचा चालक बदलण्याची गरज आहे, असे ते पुढे म्हणाले.
चुका दाखविण्याचा पूर्ण अधिकार
आपणास विरोधक म्हणून टीका करण्याचा व सरकारच्या चुका दाखवून देण्याचा पूर्ण अधिकार आहे. मंत्री गुदिन्हो यांनी नीती आयोगाची आकडेवारी चुकीची असल्यास ती चुकली आहे असे सांगायला हवे होते. त्यांनी आपणावर टीका करताना त्याचे उत्तर मिळेल हे ध्यानात ठेवायला हवे होते. उद्योग खात्याचे मंत्री या नात्याने गुदिन्हो यांना बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्याजवळ उद्योग आणतो म्हणून कोणी येत नाही. कारण मुख्यमंत्री ‘आयपीबी’ स्थापन करून बसले आहेत. खरे तर गुदिन्हो यांचे खाते मुख्यमंत्रीच हाताळत असून गुदिन्हो हे फक्त नावाचे उद्योगमंत्री आहेत, असा दावा सरदेसाई यांनी केला.
उद्योगमंत्री म्हणून गुदिन्हो यांनी कोविड काळात कोणत्याही लघुउद्योगाला मदत केली नाही. 24 लाख चौ. मी. इतकी औद्यगिक वापरासाठीची जमीन खाली पडली आहे. तेथे गुदिन्हो यांनी कोणते उद्योग आणले. आयडीसीकडे एकवेळ 100 कोटींचा निधी उपलब्ध असायचा. आता फक्त 10 कोटी आहेत. ते औद्यगिक वसाहत क्षेत्रातील रस्ते दुरुस्त करू शकत नाहीत. असे असताना मंत्री गुदिन्हो कोणत्या तोंडाने बोलतात, असा सवाल सरदेसाई यांनी केला.
साळकरनी एसजीपीडीए मार्केटकडे लक्ष द्यावे
आमदार दाजी साळकर यांनीही पत्रकार परिषदेत आपल्यावर टीका केली. परंतु आपल्याला त्यांना सांगायचेसे वाटते की, त्यांनी नीती आयोग आणि अन्य आकडेवारीत गुरफटू नये. ते नवीन आमदार आहेत. त्यांनी एसजीपीडीएचे दुर्गंधी सुटलेले मासळी मार्केट जाग्यावर घालण्याकडे लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला. या पत्रकार परिषदेत आणखी एकटी व्यक्ती काही तरी बरळली. ते पूर्वी आतषबाजीचे साहित्य घेऊन फिरत होते. त्यांचे आतषबाजीचे साहित्य सध्या शिळे झाले आहे. ते नगरसेवकही बनू शकलेले नाहीत. बाबूश मोन्सेरात आपल्याला नगरसेवक बनविणार या आशेने ते कदाचित बरळत असावेत, असा टोला सरदेसाई यांनी हाणला.
गुदिन्हेंकडून टांगत्या तलवारीमुळे मुख्यमंत्र्यांची पाठराखण
माविन गुदिन्हो यांच्यावर वीज घोटाळाप्रकरणी खटला सुरू आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गुदिन्होंविरूद्ध तक्रार दाखल केली होती. सध्याचे मुख्यमंत्री त्यांना या खटल्याच्या बाबतीत पाठिंबा देत नाहीत. मात्र हे जाणूनही गुदिन्हो मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की, त्यांच्यावर टांगती तलवार आहे, असा दावा यावेळी सरदेसाई यांनी केला.