गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांचे दिल्लीचे वीजमंत्री सत्येंद्र जैन यांना उत्तर : वादविवादामध्ये वीज मुद्दय़ांपेक्षा पक्षीय प्रचारअधिक
प्रतिनिधी /पणजी
वीज किंवा अन्य कोणतीही गोष्ट मोफत देणे शक्य नाही. मुफ्तपणाचा बाजार मांडून सरकारला कर्जबाजारी करणे गोव्याला परवडणार नाही. चोवीस तास वीज देण्यासाठी नक्की प्रयत्न करणार, त्यासाठी सरकाने कामाला सुरुवात केली असल्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले. दुसऱयाबाजूने गोव्यात ‘आप’ सत्तेवर आल्यास 300 युनिटपर्यंत वीज मोफत देणार तसेच पुढील पाच वर्षांत वीजदर वाढवणार नसल्याचे आश्वासन आम आदमी पक्षाचे दिल्लीतील वीजमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिले.
राज्यातील मोफत वीज विषयावर काल सोमवारी येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आपचे दिल्लीतील वीजमंत्री आणि गोव्यातील वीजमंत्री नीलेश काब्राल यांच्या वादविवाद कार्यक्रम झाला. प्रत्यक्षात मात्र विजेच्या विषयाखाली दोन्ही पक्षाच्या मंत्र्यांनी गोव्याची येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यास्ंमोर ठेवून अप्रत्यक्षपणे आपापल्या पक्षाचा प्रचार करताना भरमसाठ आश्वसने दिली.
चुकीची बिले ‘आप’ माफ करणार
दिल्लीतील केजरीवाल सरकार कर्ज काढून वीज मोफत देत आहे. हे गोव्याला परवडणारे नाही, असे काब्राल म्हणाले. गोवा वीज खात्याने चूक करून जनतेला भरमसाठ बिले दिली आहेत, ती माफ करणार असल्याचे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे, असे जैन यांनी सांगितले असता वीज खात्याने भरमसाठ बिले दिल्याचा काब्राल यांनी इन्कार केला. 75 टक्के ग्राहक नियमितपणे वीज बिले भरीत आहेत. केवळ 25 टक्के ग्राहक वेळीच बिले भरीत नाहीत. त्यांच्यासाठी एक रक्कमी योजना राबवीत असल्याचे काब्राल यांनी सांगितले.
वीज नेत्यांना फुकट, जनतेला विकत
मोफत वीज या विषयावर वादविवाद सुरु झाले तेव्हा सुरुवातील जैन यांनी बोलायला सुरुवात केली. गोव्यात नेत्यांना वीज फुकट तर जनतेला वीज विकत, असा टोमणा मारला. भाजप सत्तेवर येण्यासाठी आमदारांना विकत घेण्यास जनतेच्या कोटय़वधी रुपयांचा उपयोग करतो. जनतेला वीज मोफत देणे त्यांना जमत नसल्याचे जैन यांनी सांगितले.
आपने दिल्लीतील जनतेला फसविले
आपने दिल्लीतील जनतेला आश्वासने देऊन कसे फसविले असा आरोप काब्राल यांनी केला व काही पुरावेही सादर केले. सत्तेत आल्यास घरभाडे मोफत असे आश्वासन आपने दिले होते. प्रत्यक्षात आश्वसन पूर्ण न केल्यामुळे दिल्लीतील एका मतदाराने न्यायालयात आप विरोधात खटला दाखल केला. न्यायालयाने आपला कशी चपराक दिली ते सांगताना काही पुरावे काब्राल यांनी सादर करून जैन यांची हवा काढली. मात्र जैन यांनी त्या मुद्याला चालाखीने बगल देऊन विषय पुढे नेला.
दिल्लीपेक्षा गोव्यात वीज स्वस्त
वास्तविक दिल्लीपेक्षा गोव्यात वीज स्वस्त असल्याचा दावा काब्राल यांनी केला. मोफत वीज दिली नसली तरी राज्यातील सर्व घटकांना अनुदान दिले जाते. यावर जैन यांनी अनुदान जाते कुठे? असा उलट प्रश्न उपस्थित करून सरकारचे अनुदन कंत्राटदार कंपनीच्या खिशात जात असल्याचा आरोप केला.
दिल्लीत कर्ज काढून सण साजरे
दिल्ली सरकारचा चालू अर्थसंकल्प 60,700 कोटीचा असून त्यात 4291 कोटीचे कर्ज दाखविले आहे. दिल्ली जल बोर्डाच्या डोक्यावर 26 कोटीचे कर्ज आहे तर ज्या कंपनींवडून वीज घेतली जाते त्या कंपनीला 20 हजार कोटी दिल्ली सरकार द्यायचे आहे. कर्ज काढून सण साजरे करणे गोव्याला जमणार नाही असे काब्राल म्हणाले.
गोव्यात वीज येते परप्रांतांतून
गोव्यात वीज खंडीत होण्याची कारणे देताना काब्राल म्हणाले की वीज निर्मिती करणाऱया कंपन्या गोव्यात नसल्यामुळे परप्रांतातून वीज गोव्यात आणली जाते. गोव्यात वीज आणतांना काही समस्या निर्माण होतात. तसेच गोव्यात वादळ वारा पाऊस मोठेमोठे डोंगर तसेच झाडे आहेत. भौगोलिकदृष्टय़ा दिल्लीपेक्षा गोवा वेगळा आहे. सद्या गोव्यात एकाच ग्रीडमधून वीज मिळते त्यासाठी आणखी एक ग्रीड वाढविली जाईल, असे काब्राल यांनी सांगितले.
दिल्लीलाही वीज बाहेरूनच आणवी लागते. दिल्लीत वीज तयार करणारी कंपनी नाही. मात्र दिल्लीत वीज खंडित कधीतच होत नाही. 200 युनिटपर्यंत दिल्लीत वीज मोफत दिली जाते. तर 400 युनिटपर्यंत निम्या दरात दिली जाते. जनतेच्या पैशाचा जनतेसाठीच वापर करीत असल्याचे सांगताना जैन म्हणाले की दिल्लीत 247 कोटीचा उड्डाण पुल निर्धारीत वेळेत उभारून आम्ही 100 कोटी रुपये वाचविले आहेत. हेच पैसे जनतेला वीज मोफतच्या स्वरूपात देत आहोत. गेली सात वर्षे दिल्ली सरकारने कोणतेही कर्ज काढलेले नाही. किंवा जनतेवर कर्ज लादले नाहीत. शिवाय दरवाढही झाली नाही असे जैन यांनी सांगितले. गोव्यात अखंडित वीज, मोफत वीज आणि चुकीच्या पध्दतीने दिलेली बिले माफ करण्यावर आप ठाम असल्याचेही जैन यांनी सांगितले.
दरम्यान एका दिल्लीतील व्यक्तीने जैन यांना बाहेर येताना गाठून आपल्याला वीज बिल कशाप्रकारे चुकेचे आले ते दाखविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. गोव्यातील वीजखात्याबाबत चुकीची माहिती पसरविणारी सभागृहात पत्रके वाटण्यात आली होती.
पत्रकारांचे प्रश्न सोडून भलतीच उत्तरे
वादविवाद सत्रात पत्रकारांनीही दोन्ही मंत्र्यांना प्रस्न विचारले. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळाली मात्र अधिकाधिक प्रश्न वगळून भलतेच उत्तर देत असल्याचे जाणवले. वादविवाद कार्यक्रम झाल्यानंतर नीलेश काब्राल बाहेर आले, तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. जैन विरोधात घोषणाबाजीही केली. घटनास्थळी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.