यड्राव ग्रामपंचायतीवर मोर्चा ; ग्रामविकास अधिकार्यांना दिले निवेदन
यड्राव / वार्ताहर
येथील राजर्षी शाहू महाराज चौक एस.टी.स्टॉड ते मराठी शाळा विभागातील नागरीकांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून पिण्याचे पाणी मुबलक मिळावे. यासाठी ग्रामपंचायत विरोधी पक्ष नेते व ग्रामपंचायत सदस्य महावीर ऊर्फ बंडू पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.गावडे यांना निवेदन देण्यात आले. संपुर्ण गावात नोटीसा न देता केवळ आमच्या विभागात नोटीसा दिल्या आहेत. हे अन्याकारक आहे. असे म्हणत नागरीक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यात शब्दीक बाचाबाची झाली.
यड्राव ग्रामपंचायतीकडून एस.टी.स्टॉड ते मराठी शाळा विभागातील नळधारकांना नळास मोटर न लावण्याच्या नोटीसा दिल्या आहेत. यानंतर येथील संतप्त झालेल्या नागरीकांनी आज ता.30 रोजी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. यावेळी येथील नागरीकांनी पाण्याबाबत व्यथा मांडल्या. ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.गावडे यांनी प्रशासकांच्या आदेशानंतर या नोटीसा दिल्या गेल्या असल्याचे सांगितले. मात्र संतप्त झालेल्या नागरीकांनी अधिकारी व कर्मचार्यांच्यावर आपल्या मागण्यांचा मारा सुरूच ठेवला.
येथे पाणी कमी दाबाने पुरवठा होत आहे. शिवाय इतरत्र पेक्षा अधिक नळ कनेक्शन आहेत. रात्री अपरात्री अवेळी पाणी पुरवठा केला जातो. याबाबत अनेकवेळा नागरीकांनी ग्रा.पं.ला निवेदन देऊनही ग्रा.पं.प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप केला. शिवाय जोपर्यत या विभागात दोन व्हॉल्व केले जाणार नाहीत. तोपर्यंत आम्ही नळास मोटरी लावणार असल्याचा निर्धार नागरीकांनी केला. शिवाय नळाला मोटर लावण्यानंतर संबंधीत विभागाने कारवाई केल्यास. त्यापुढे होणार्या तीव्र आंदोलनास सर्वस्वी ग्रामपंचायत संबधीत अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील असा इशारा यावेळी नागरीकांनी दिला.
यावेळी केशव धुमाळे, माजी ग्रा.पं.सदस्य राजु डी.के. पाटील, गणेश साळूंखे, विकास लवाटे, महादेव बागे, रियाज पिंजारी, शुभंम निंबाळकर, चंद्रकांत ऊर्फ पिंटू साळूंखे, शार्गिद पिंजारी, असिफ मुल्ला यांच्यासह प्रभागातील नागरीक उपस्थित होते. प्रशासकांच्या आदेशानंतर येथील नळधारकांना नोटीसा दिल्या आहेत. आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासकांना देऊन त्यांच्याशी चर्चा करून लवकरच यावर तोडगा काढत, वेळेत कार्यवाही करण्यात येईल.
व्ही.व्ही.गावडे, ग्रामविकास अधिकारी वेळेत या प्रभागात दोन व्हॉल्व करून द्यावे अन्यथा नागरीकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करून रास्ता रोको केला जाईल.