प्रतिनिधी /वास्को
मुरगावचे माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, त्यांच्या पत्नी नगरसेविका प्रीया राऊत यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी रविवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुळ भाजपाचे कार्यकर्ते असलेले नंदादीप राऊत पालिका निवडणुकीपासून भाजपापासून दूरच राहिले होते. अखेर त्यांनी काँग्रेस प्रवेश केल्याने वास्कोत काँग्रेसचे काही प्रमाणात बळ वाढले आहे.काँग्रेसचे नेते आमदार दिगंबर कामत, प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर, प्रदेश महिला अध्यक्ष बिना नाईक, प्रदेश उपाध्यक्ष संकल्प आमोणकर व मान्यवर नेत्यांनी नंदादीप राऊत, सौ. प्रीया राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले.
रविवारी संध्याकाळी वास्को शहरातील एमपीटी इन्स्टीटय़ुट हॉलमध्ये या पक्ष प्रवेशासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर काँग्रेस नेते एम.के. शेख, माजी नगराध्यक्ष सैफुल्ला खान, काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नझीर खान, वास्को गट अध्यक्ष उलारीको रॉड्रिक्स, माजी नगराध्यक्ष शरद चोपडेकर, पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर, नियाजी शेख व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची उपस्थितीही मोठी होती. स्वा. इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना या कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.
विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी यावेळी बोलताना गोव्यात सर्वच मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचा दावा करून गोव्यातील लोकांना आता बदल हवा असल्याचे दिसून येत असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या सत्ताकाळात लोकांच्या हाती पैसा होता. आज लोक त्रस्त बनलेले आहेत. आतापर्यंत जनतेने बरेच सेसले आहे.वास्कोतील लोकांनी तर या सरकारच्या काळात अधिकच हालअपेष्ठा सोसलेल्या आहेत. कोळशामुळे इथली जनता त्रस्त आहे. या प्रदुषणामुळे लोकांचे बळी गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यानंतर लोकांना कोळशाचा त्रास होऊ देणार नाही. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनीही कोळशामुळे लोकांचे जीवन उद्य्वस्त होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. काँग्रेस पक्षाला लोकांची काळजी आहे. जनता भाजपा सरकारपासून त्रस्त असून काही गोव्याबाहेरील राजकीय पक्ष गोव्यात येऊन या परिस्थितीचा लाभ उठवू पाहात आहेत. लोकांना खोटी आश्वासने देण्यात येत आहे. त्यांच्या आश्वासनाना जनतेने बळी पडू नये असे आवाहन आमदार दिगंबर कामत यांनी केले. गोवा गोमंतकीयांचाच असून गोव्यात तेच राज्य करतील. त्यांनाच गोव्याचे हित माहित आहे असे आमदार कामत म्हणाले.
प्रदेश अध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी यावेळी बोलताना भाजपा सरकारवर निष्क्रीयतेचे आरोप केले.वास्कोत दहा वर्षांत कोणतेही विकास काम या सरकारने केलेले नसल्याचे ते म्हणाले. नंदादीप राऊत यांनीही आपले म्हणणे मांडताना भाजपावर टीका केली.भाजपाला दोन वेळा संधी मिळाली होती. मात्र, त्यांनी अपेक्षाभंग केला. वास्कोत गेल्या दहा वर्षात काही गेले नाही. फुटपाथ आणि पेवर्स म्हणजे विकास नव्हे. पर्यटक वास्कोत येण्याची आवश्यकता होती. वास्कोतील समुद्रकिनाऱयांचा विकास व्हायला हवा होता. काँग्रेस पक्षच विकासासाठी सक्षम असून मागच्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसच्या विजयाला प्रारंभ झालेला आहे असे ते म्हणाले. आपण 1500 हून अधिक कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला असल्याचा दावा नंदादीप राऊत यांनी केला. आपण जनतेसाठी हेल्पलाईन उपलब्ध केलेली असून अडीअडचणींच्या वेळा मदत करण्यासाठी वाहनही उपलब्ध करण्यात आलेले आहे. ही हेल्पलाईन चोवीस तास खुली राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. या कार्यक्रमात संकल्प आमोणकर, नझीर खान, सैफुल्ला खान, शरद चोपडेकर व इतर मान्यवरांचीही भाषणे झाली.