प्रतिनिधी/ वास्को
येणाऱया पालिका निवडणुका आणि त्यानंतर दीड वर्षात येणाऱया विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून मुरगाव मतदारसंघातील भाजपाविरोधी मते गाळण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संकल्प आमोणकर व त्यांच्या समर्थकांनी केला आहे. या प्रश्नावर आपण निवडणुक आयोग व प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे आमोणकर यानी म्हटले आहे.
शनिवारी दुपारी यासंबंधी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संकल्प आमोणकर व त्यांच्या समर्थकांनी यापूर्वीही असाच प्रकार मागच्या विधानसभा निवडणुकांवेळी झाला होता. मात्र, निवडणुक आयोगाकडे यासंबंधी तक्रार करून तो प्रयत्न हाणून पाडण्यास यश आले होते. परंतु आता पुन्हा तोच प्रकार सुरू झालेला असून 1400 मतदारांची नावे गाळण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. हे राजकीय पातळीवरून होत आहेत. संबंधीत शासकीय कर्मचाऱयांवर हा प्रकार उरकण्यासाठी दबाव येत आहे असे स्पष्ट करून संकल्प आमोणकर व त्यांच्या समर्थकांनी नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्यावर आरोप केले. मतदार यादीतून गाळण्यासाठी निवडण्यात आलेले मतदार हे भाजपाविरोधी गटातील असून त्यानाच लक्ष्य करण्यात आले आहे असे ते म्हणाले. या मतदारांना गाळण्याबरोबरच नवीन 750 संशयास्पद मतदारांना मतदार यादीत घुसडण्याचाही प्रयत्न होत असल्याचाही दावा आमोणकर यांनी यावेळी केला. या प्रश्नावर आपण मुरगाव मामलेदार कार्यालयातील संबंधीत अधिकाऱयांशी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत चर्चा केलेली आहे. ज्या मतदारांची नावे गाळण्यात येणार आहेत तसेच ज्या मतदारांची नोंदणी होणार आहे, त्यांची यादी हा सोपस्कर पूर्ण करण्या आधी नोटीस बोर्डवर जाहीरपणे प्रदर्शीत करावी. ही माहिती जनतेलाही कळायला हवी अशी मागणी केल्याचे आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालिका निवडणुकीत आणि येत्या विधानसभा निवडणुकीतही यश येईल असे मंत्री नाईक यांना वाटत नाही. मागच्या निवडणुकीत ते अल्प मतांनी जिंकलेले होते. त्यामुळेच त्यांनी भाजपाविरोधी मतदारांना लक्ष्य केलेले आहे असा आरोप आमोणकर यांनी केला. मतदान हा भारतीय नागरिकांचा हक्क असून खोटारडेपणा आणि फसवणुक करून तो हिरावता येणार नाही. आपल्या मतदान हक्का बाबत मुरगाव मतदारसंघात काय चालले आहे याबाबत सामान्य मतदारांना काहीही माहिती नाही. निवडणुका येताच त्यांना आपला अधिकार हिसकावल्याचे कळून येईल. हा प्रकार वाढत जाण्याची शक्यता असल्याने मुरगावातील मतदारांनी आतापासूनच सतर्क राहावे असेही आवाहन त्यांनी केले आहे. मामलेदार कार्यालयातील अधिकाऱयांनीही राजकीय दडपणाला बळी पडू नये असेही त्यांनी म्हटले आहे. सत्तेचा गैरवापर करून आपल्याला नको असलेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून गाळण्याचा प्रयत्न आपण खपवून घेणार नाही. निवडणुक आयोगाकडे आणि प्रसंगी उच्च न्यायालयातही दाद मागणार असल्याचे आमोणकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी काँग्रेसचे गट अध्यक्ष महेश नाईक तसेच विठ्ठलदास बांदेकर, समीर शेख, जयेश शेटगावकर यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करून केवळ मुरगाव मतदारसंघात सत्तेच्या बळावर अनेक गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकारचे राजकारण व विरोधकांवर होणारा अन्याय यापूर्वी या मतदारसंघात कधीही आढळून आला नव्हता असेही या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला सचिन भगत, उध्दव पोळ, सिराज शेख, उमेश मांदेकर व अन्य मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.