जनतेच्या मनात भरली होती धडा शिकवण्याची हवा, पंधरा वर्षांनंतर मिलिंद नाईक अद्याय संपला
प्रतिनिधी /वास्को
मुरगावचा भाजपाचा बालेकिल्ला अखेर डासळला. बहुचर्चित मुरगाव मतदारसंघात भाजपाला कथीत वासनाकांड बरेच भोवल्याचे दिसून आले. अन्यथा या मतदारसंघात काटे की टक्कर झाली असती अन् कदाचित भाजपा पुन्हा काटावर विजयी झाला असता. या मतदारसंघात भाजपाला आता नव्याने तयारीला लागावे लागणार आहे. भाजपाने या मतदारसंघावर पंधरा वर्षे राज्य केले.
मुरगाव मतदारसंघ हा पूर्वीपासून हिंदू बहुल मतदारसंघ म्हणून ओळला जातो. या मतदारसंघात पूर्वी महाराष्ट्रवाद खच्चून भरलेला होता. मात्र, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने स्व. गजानन पाटील आणि स्व. वसंतराव जोशी यांच्या नेतृत्वाखाली दोनच वेळा विजय मिळवला. त्यानंतर स्व. शेख हसन हरूण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तब्बल पंचवीस वर्षे राज्य केले. एकदा अपक्ष व पुन्हा एकदा काँग्रेस अशा पध्दतीने हिंदुबहुल मुरगाव मतदारसंघात काँग्रेसनेच अधिक राज्य केले.
2012 पासून मुरगावात भाजपाची पत घसरू लागली होती
99 सालापासून मुरगावात भाजपाचे वारे वाहू लागले होते. परंतु विजय मिळाला नव्हता. 2007 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मुरगावचे एक नगरसेवक व बांधकाम व्यवसायीक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नाईक इतर ईच्छुकांना टांग देत मुरगावचे भाजपाचे उमेदवार म्हणून पुढे आले आणि जनतेच्या भरघोस पाठींब्यावर निवडूनही आले. मुरगाव मतदारसंघातील मोठी लोकवस्ती असलेल्या हेडलॅण्ड सडा बोगदा परीसराला आपला वस्तीतील आमदार कधी लाभला नव्हता. मिलिंद नाईक यांच्या रूपाने त्यांना पहिल्यांदाच आपला आमदार लाभला होता. चांगला जनाधार लाभल्याने मिलिंद नाईक त्यावेळी 2406 मतांच्या आघाडीने विजयी झाले होते. 2007 नंतरचा मुरगावचा राजकीय इतिहास सर्वानाच माहित आहे. या इतिहासात मुरगावात भाजपाची पत घसरायला लागली होती. या निवडणुकीत तर भाजपाने हाय खाल्ली. या बालेकिल्ल्यात केवळ मिलिंद नाईक यांचे नुकसान झाले नाही तर भाजपाच्या इभ्रतीचाही प्रश्न निर्माण झाला. 10 मार्चला भाजपाच्या घसरलेल्या दर्जावर शिक्कामोर्तबच झाले. 140 मतांनी मागच्या निवडणुकीत हरलेल्या काँग्रेसच्या संकल्प आमोणकर यांनी मिलिंद नाईक यांचा 1941 मतांनी पराभव घडवून आणला.
काँग्रेसने घेतला मिलिंद नाईक विरूध्द संधीचा लाभ
तसे पाहता मुरगावात भाजपाला 2007 मध्ये लाभलेला जनाधार पुन्हा लाभला नाही. 2012 साली संकल्प आमोणकर यांनी मिलिंद नाईक यांच्यासमोर आव्हान उभे केले. या आव्हानाचा सामना करताना मिलिंद नाईक यांना 913 मतांच्या आघाडीने तारले. त्यानंतर 2017 साली पुन्हा संकल्प आमोणकर यांनी काँग्रेसला विजयी करण्यासाठी भाजपा व मिलिंद नाईक यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले. मात्र, पुन्हा एकदा मिलिंद नाईक यांना नशिबाची साथ मिळाली अन् भाजपाचे कमळ कोमजता कोमजता वाचले. या निवडणुकीत मिलिंद नाईक यांना केवळ 140 मतांनी भाजपाची जागा आणि आपले आमदारपद राखता आले. यंदाच्या निवडणुकीत मात्र, काँग्रेसला भाजपाचे आमदार आणि मंत्री मिलिंद नाईक यांना घेरण्यासाठी आयतीच संधी मिळाली. या संधीचा पुरेपूर लाभ काँग्रेसचे उमेदवार संकल्प आमोणकर यांनी तो विषय प्रचाराचा मुद्दा न बनवताही व्यवस्थीत उठवला. सतत तीन वेळा निवडून आलेल्या मिलिंद नाईक यांची पहिली पाच वर्षे कोणत्याही वादावीना गेली. दुसऱया व तीसऱया काळात ते मंत्री राहिले. हा त्यांचा काळ या ना त्या कारणाने वादग्रस्तच ठरला. त्यांचे विरोधक संकल्प आमोणकर यांनी त्यांच्याविरूध्द दंडच थोपटले होते. अनेक आरोपांमुळे मिलिंद नाईक गोव्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरले. आज निवडणुक हरल्यानंतरही ते चर्चेतच आहेत.
मतदारांच्या मनात भरली होती धडा शिकवण्याची हवा
वर्षभरापूर्वी पालिका निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांतही मुरगावात भाजपाला आणि पर्यायाने मिलिंद नाईक यांच्या समर्थक उमेदवारांना जनतेने बऱयापैकी कौल दिला होता. एकूण नऊ प्रभागांपैकी सात प्रभागांमध्ये त्यांचे उमेदवार विजयी झाले होते तर संकल्प आमोणकर यांचे दोनच उमेदवार विजयी झाले होते. या यशामुळे मिलिंद नाईक वर्षभरात होणारी विधानसभा निवडणुक हरतील असे भाजपाला वाटले नव्हते. मात्र, वर्षभरात फासे उलटे पडले. बराच काळ सुप्त अवस्थेत राहिलेले कथीत वासनाकांड प्रकरण समोर आले आणि गोवा हादरला. प्रदेश भाजपाचीही या प्रकरणात बरीच नाचक्की झाली. मुरगाव मतदारसंघ क्षणात प्रकाशझोतात आला. मिलिंद नाईक यांना उमेदवारी नाकारण्यासाठी खलबते सुरू झाली. मात्र, भाजपाकडे अन्य सक्षम पर्याय नव्हता. त्यामुळे भाजपाने धोका पत्करला. बदनामी झालेली असली तरी त्यांच्यासोबत मोठय़ा संख्येने कार्यकर्ते होते. महिलांही मोठय़ा संख्येने त्यांना पाठींबा देण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या. त्यामुळेच ते जिंकू शकतात अशी हवा पसरली होती. मात्र विटलेल्या जनतेच्या मनात धडा शिकवण्याची हवा तयार झाली होती याचा प्रत्यय 10 मार्चला आला. मुरगावात भाजपाला या निवडणुकीत ते वासनाकांडच भोवले अशी चर्चा सध्या वास्को मुरगावात झडू लागलेली आहे.
मिलिंद नाईकांचा अद्याय संपला, भाजपाला नव्याने सुरवात करावी लागणार
मागच्या दहा वर्षात मिलिंद नाईक विकास कामात कमी पडले नाहीत असे लोकांमध्ये बोलले जाते. शेकडो लोकांना शासकीय नोकऱया देण्यातही ते यशस्वी ठरले. खासगी रोजगाराच्या संधीही त्यांनी मोठय़ा संख्येने मिळवून दिल्या असेही लोक बोलतात. तरीही त्यांचा जवळपास दोन हजार मतांच्या फरकाने पराभव होतो याचा अर्थ मिलिंद नाईक यांच्या वर्तनाबाबत लोकांमध्ये संशय निर्माण झालेला असू शकतो. त्यामुळेच लोकांनी संकल्प आमोणकर यांना जवळ केले. मिलिंद नाईक मुरगावात भाजपाचे पहिलेच निवडून आलेले आमदार होते. मिलिंद नाईकचा अद्याय आता संपलेला आहे. भाजपाचा बालेकिल्ला ढासळलेला आहे. भाजपाला पुन्हा नव्याने सुरवात करावे लागणार आहे. कदाचित नवीन नेताही शोधावा लागेल.