प्रतिनिधी /वास्को
मुरगाव तालुक्यातील शालेय शिक्षणाला सोमवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. बऱयाच शाळांतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये विविध प्रकारे स्वागत केले.
सुमारे दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्याने शालेय शिक्षण क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मुरगाव तालुक्यातील सर्वच शाळांनी सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांसाठी आपले वर्ग खुले केलेले असून विद्यार्थ्यांनी काल सोमवारी पहिल्याच दिवशी शाळेतील वर्गांना चांगला प्रतिसाद दिला. या विद्यार्थ्यांचे काही शाळांमधील शिक्षकांनी आरती ओवाळून, फुल पाकळय़ांचा वर्षाव करून तसेच हर्ष उल्हासाने स्वागत केले. मुलेही या उत्साहाने भारावून गेली. मुले, शिक्षक, पालक व शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱयांच्याही चेहऱयावर आनंद दिसत होता. गेली सुमारे दोन वर्षे मुले घरीच राहून वैतागली होती. ऑनलाईन वर्गांतून मुलांना शिक्षणाचा खरा आनंद घेता येत नव्हता. ऑनलाईन शिक्षणापासून अनेकांना वंचीतही राहावे लागले होते. कोरोनामुळे मागच्या दोन वर्षांत मुलांच्या शिक्षणावर व त्यांच्या वयक्तीक विकासावरही परीणाम झालेला आहे. आता शाळा सुरू झाल्याने हा धोका दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करून बऱयाच पालकांनी सरकारच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.
मुरगाव तालुक्यातील सर्वच शाळा खुल्या झालेल्या आहेत. मात्र, काही शाळांना अद्यापही मर्यादीत वर्ग घेणे पसंद केलेले आहे. काहींनी दिवसा आड केवळ अडिच तासांसाठी, काहींनी माध्यमीक वर्ग तर काहींनी प्राथमीक वर्ग सुरू केलेले असून पुढील काही दिवसांत शाळांमधील वर्ग पूर्णपणे खुले होणार आहेत. शाळा सुरू करण्यासाठी सरकारने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक सर्व नियमांचे पालन करून वर्ग भरवण्यात येत असल्याचे शाळां व्यवस्थापांनी म्हटले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यास पालकांचा नकार
दरम्यान, वास्को शहरातील सेंट ऍड्रय़ू हायस्कुलच्या प्रांगणात काही पालकांनी व्यवस्थापनाविरूध्द गोंधळ घातला. या शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी पालक घेत आहेत अशा आशयाच्या हमीपत्रावर सहय़ा घेण्यास सुरवात केल्याने हा गोंधळ झाला. शाळा सुरू करताना सरकारने किंवा शिक्षण खात्याने पालकांना विश्वासात घेतलेले नाही. शाळेच्या पालक शिक्षक संघाचीही शाळा सुरू करण्याच्या विषयावर बैठक झालेली नाही. आणि मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी मात्र,पालकांवर ढकलण्यात येत आहे. हा चुकीचा प्रकार आहे असे स्पष्ट करून काही पालकांनी शिक्षकांना जाब विचारला. भाग शिक्षण अधिकाऱयांची भेट घेऊन या पालकांनी त्यांनाही असुरक्षीत वातावरणात वर्ग खुले करण्याबाबत जाब विचारला. शाळा खुल्या करायच्या असल्यास सरकारनेच मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, पालक ही जबाबदारी घेणार नाही असे या पालकांनी सुनावले. काहींनी अद्यापही कोरोना संपुष्टात आला नसल्याने ऑनलाईन वर्गच घेण्याची मागणी केली. या संबंधी या पालकांनी एक निवेदन शिक्षण संचालकांना पाठवले आहे.