हेडलॅण्ड सडय़ावरील नागरिकांचा आरोप
प्रतिनिधी / वास्को
मुरगाव पोलीस स्थानकात केवळ काँग्रेस कार्यकर्ते किंवा भाजपाविरोधकांवरच गुन्हे नोंदवण्यात येत असून भाजपा कार्यकर्त्यांच्या दांडगाईविरूध्द गुन्हाच दाखल होत नाही असा आरोप हेडलॅण्ड सडयावरील नागरिकांनी केला आहे. मागच्या दहा वर्षांपासून भाजपाविरोधकांच्या तक्रारींची दखल मुरगाव पोलीस स्थानकात घेतली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुरगाव सिटीजन्स या संघटनेने मंगळवारी वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुरगाव पोलीस एकतर्फी भुमिका बजावत असल्याचे स्पष्ट करून पोलीस महासंचालक आय.डी. शुक्ला यांच्या भुमिकेवरही त्यांनी संशय व्यक्त केला. हल्लीच होळीच्या दिवशी बोगदा येथे जी मारामारी झाली त्या घटनेशी राजकारणाचा काहीच संबंध नव्हता. वाडय़ावरील दोन कुटुंबांमध्ये वारंवार होणाऱया वादाचाच तो परीणाम होता. मात्र, तो वादसुध्दा भाजपाविरूध्द काँग्रेस अशा राजकारणाला जोडून नाहक बराच गोंधळ घालण्यात आला. नाहक अनेक युवकांना गोवण्यात आले. पोलिसांनी एकतर्फीच भुमिका बजावली. मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या नेत्यांनी या वादाचा बाऊ केला. पोलीस महासंचालक आय.डी. शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली आणि एकतर्फीच बोलत राहिले. भाजपाच्या कार्यकर्त्यांविरूध्द केलेल्या तक्रारीची कोणतीही दखल आतापर्यंत घेतली गेली नाही असे स्पष्ट करून उपस्थित नागरिकांनी या अन्यायाचा निषेध केला.
मुरगावमध्ये मागच्या दहा वर्षांपासून भाजपाविरोधकांना पोलीस स्थानकात असाच वाईट अनुभव येत आहे. आता भाजपाचा मुरगावमध्ये पराभव झाल्याने वैफल्यग्रस्तता वाढलेली असून पुन्हा वेळो वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरूध्द कारवाया होत आहेत. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नाही असे स्पष्ट करून नागरिकांनी काही मारहाणीच्या प्रकरणांची माहिती दिली. मुरगावात सुडबुध्दीच्या राजकारणाला पोलिसांकडूनही पाठींबा मिळत आहे. डॉ. प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्री बनलेले आहेत. ते सर्वांचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वांना न्याय द्यावा. नाहक गुन्हे नोंद करून तरूणांचे भवितव्य खराब करू नका असा सल्लाही यावेळी उपस्थितांनी दिला. या पत्रकार परिषदेत बालन चोडणकर, शंकर पोळजी, विनी भगत, ऍड. अविनाश यांनी मुरगाव मतदारसंघात यापूर्वी व सध्या घडणाऱया अन्यायकारक प्रकरणांची माहिती देऊन अशा घटनांचा निषेध केला. पोलीस महासंचालक आय.डी. शुक्ला यांनी मटका व गैरव्यवहार बंद करण्याचे जाहीर केले होते. परंतु तो सर्वत्र चाललेला आहे. तो अद्याप बंद का होत नाही असा प्रश्न बालन चोडणकर यांनी महासंचालकांना उद्देशून केला.