प्रतिनिधी/ वास्को
केंद्र सरकारच्या सागर माला प्रकल्पाअतर्गंत मुरगाव बंदर प्राधिकरणाने(एमपीए) मागच्या सात वर्षात 570 कोटी 53 लाख रूपये किमतीचे 11 विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत. सागर माला प्रकल्पा अंतर्गंत 250 कोटी 37 लाखांच्या 5 प्रकल्पांची कार्यवाही चालू असून 842 कोटींचा 1 प्रकल्प विकसीत होत आहे. तर 567 कोटींचे 4 प्रकल्प अद्याप विचाराधीन आहेत. ही माहिती मुरगाव बंदर प्राधिकरणाचे उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकारने 2015 साली सागर माला या महत्वकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ केला होता. या प्रकल्पाला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. सागरी प्रकल्पांचा विकास, सक्षमतेचा विस्तार करणे, बंदरांचे आधुनिकीकरण करणे, बंदरांच्या विकासासाठी देशातील सागर किनारा व सागरी दळणवळणाचा विकास करणे असे विविध उध्देश साध्य करण्याचा हेतू सागरमाला प्रकल्पामागे होता. या प्रकल्पाला आता सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘सफलता के सात साल’ या शिर्षकाखाली केंद्र सरकारच्या बंदर व जहाजोद्योग मंत्रालयातर्फे या वर्षी यशस्वी सात वर्षे साजरी करण्यात येत आहेत. मुरगाव बंदर प्राधिकरणही विविध कार्यक्रमसह सात वर्षे साजरी करीत असून या निमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्राधिकरणाचे उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी बंदराने साधलेल्या विकासाची माहिती दिली.
मुरगाव बंदर प्राधिकरणाने मागच्या सात वर्षांच्या काळात एकूण 570 कोटी 53 लाख रूपये किमतीचे 11 विकास प्रकल्प पूर्ण केले आहेत. बंदरातील प्रुझ टर्मिनल बिल्डींग 7 कोटी 67 लाख रूपये खर्चून उभारण्यात आलेली असून हा प्रकल्प 2016 साली पूर्ण करण्यात आला होता. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध केला होता. 2019 साली फुल रेक वॅगन हॅण्डलींग रेल्वे लाईन प्रकल्प 17 कोटी 65 लाख खर्चून पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर मागच्या वर्षी सप्टेबरमध्ये दुसरा फेल रेक वॅगन हॅण्डलींग रेल्वे लाईन प्रकल्प 7 कोटी 83 लाख खर्चून पूर्ण करण्यात आला. मोठा जहाजांसाठी वाट मोकळी करण्यासाठी व अधिकाअधिक महसुल प्राप्त करण्याच्या उद्देशाने बंदरातील दोन मुरींग डॉफ्लीन हटवण्यात आले. 14 कोटी 54 लाख रूपये खर्चून दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्य पूर्ण करण्यात आला. केंद्रीय पर्यंटन मंत्रालयाअंतर्गंत 4 कोटी 92 लाख रूपये खर्चून बंदरातील पर्यटक धक्का आणि परदेशगमन कार्यालयाचा विकास करण्यात आला. 14 कोटी 77 लाख रूपये खर्चून ब्ंादरातील अंतर्गंत रेल्वे लाईनसाठी सिग्नलींग ऍण्ड टेली कॉमुनिकेशन यंत्रणा विकसीत करण्यात आली. 5 कोटींच्या खासगी गुंतवणुकीव्दारे बायणा किनाऱयावर बायणा ते पणजी अशा जल प्रवासासाठी फेरीसेवा 2017 साली उपलब्ध करण्यात आली. 2017 साली कंटेनर स्टोरेजसाठी 15 कोटी खर्चून जमीनीचा विकास करण्यात आला. 9 कोटी 60 लाख रूपये खर्चून मांडवी नदीत मागच्या वर्षी तरंगता धक्का उभारण्यात आला. 546 कोटी खर्चून वास्कोतील वरूणापुरी ते हेडलॅण्ड सडापर्यंतच्या चौपदरी महामार्गाचे हल्लीच उद्घाटन करण्यात आले. या शिवाय अन्य प्रकल्पही सागरमाला अंतर्गंत मुरगाव बंदर प्राधिकरणाने पूर्ण केलेले असल्याची माहिती उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी दिली.
या प्रकल्पांबरोबरच मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या 250 कोटी 37 लाखांच्या 5 प्रकल्पांची कार्यवाही चालू असून 842 कोटींचा 1 प्रकल्प विकसीत होत आहे. तर 567 कोटींचे 4 प्रकल्प अद्याप विचाराधीन आहेत. यात चौपदरी उड्डाण पुलाव्दारे मुरगाव बंदर जोडण्याचा प्रकल्प, जवळपास 102 कोटींचा आंतरराष्ट्रीय व देशी प्रुझ टर्मिनल, रोपॅक्स व फेरी सेवा मुरगाव बंदरात उभारण्यात येणार आहे. हे प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होणार आहेत. येणाऱया काळात मुरगाव बंदराला जोडणाऱया महामार्गाच्या विकासाची कामे तसेच मुरगाव बंदरात धक्क्यांचा फेरविकास व 3 बार्ज धक्केही उभारण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना प्राधिकरणाचे उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय यांनी मुरगाव बंदरातील कंटेनर मालवाहू सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. नवीन कंपनीलाही या सेवेसाठी निमंत्रण देण्यात आलेले आहे. साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारचीही मदत घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुरगाव बंदरात बॉक्साईट खनिज आणि साखर हाताळणीलाही संधी देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.