प्रतिनिधी / वास्को :
चिखलीच्या ग्रामस्थांनी कष्ट घेऊन तयार केलेला भू वापर आराखडा व भू वापर नोंदणीचा दस्तऐवज मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने फेटाळल्याचे उघडकीस आले आहे. त्याऐवजी प्राधिकरणाने स्वताचा आराखडाच सरकारला पाठवलेला असून ही मनमानी हाणून पाडण्यात येईल असा इशाराला ग्रामस्थांनी दिला आहे.
मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने चिखली पंचायत क्षेत्राचा भू वापर आराखडा तयार करून काही महिन्यांपूर्वी चिखलीतील ग्रामस्थांसमोर शंककुशंका दूर करण्यासाठी मांडला होता. या आराखडय़ात बऱयाच तफावती आढळून आल्याने ग्रामस्थांनी त्या आराखडय़ाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी स्वता कष्ट घेऊन आराखडा तयार केला होता. हा आराखडा त्यानंतर मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाकडे सुपुर्द केला होता. हा आराखडा प्राधिकारणाने स्विकारण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ग्रामस्थांना अंधारात ठेवून प्राधिकरणाने ग्रामस्थानी आक्षेप घेतलेला जूनाच आराखडा मान्यतेसाठी सरकारकडे पाठवल्याचे आढळून आल्याने चिखली ग्रामस्थ कृती समितीमध्ये नाराजी पसरलेली आहे. या प्रकाराविरूध्द योग्य मार्गाने लढा देण्यात येईल असे कृती समितीने म्हटले आहे.
गुरूवारी यासंबंधी ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाने केलेल्या चुकीच्या प्रकाराची सविस्तर माहिती दिली. प्राधिकरणाने तयार केलेल्या मुळ आराखडय़ात चिखली पंचायत क्षेत्रातील भू वापराची योग्य माहिती देण्यात आली नव्हती. चिखली पंचायत क्षेत्राला नैसगीक देणगी लाभलेली असून सर्व परीसर हिरवाईने नटलेला आहे. खाजन जमीन, दुर्मिळ सागरी संपदाही या क्षेत्रात आहे. मात्र, प्राधिकरणाच्या आराखडय़ात या पर्यावरणीयदृष्टय़ा अत्यंत महत्वाची गोष्टी दाखवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळेच ग्रामसभेत त्यांच्या आराखडय़ाला विरोध दर्शवून ग्रामस्थांनी स्वता कष्ट घेऊन या पंचायत क्षेत्रातील नैसर्गीक वैभव दाखवणारा आराखडा तयार केला होता. हा आराखडा स्विकारण्याचे आशवासन देऊन तो धुडकावण्यात आलेला असून हा आराखडा धुडकावण्यामागे चिखली पंचायत क्षेत्र ओसाड करण्याचा प्राधिकरणाचा उद्देश असण्याचा संशय चिखलीच्या ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या प्रकाराविरूध्द चिखलीचे सर्व ग्रामस्थ एकत्र येतील व चिखली पंचायत क्षेत्र ओसाड बनवण्याचा उद्देश हाणून पाडतील. त्यासाठी चिखली ग्रामस्थ कृती समिती योग्य त्या मार्गाचा अवलंब करेल असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. या पत्रकार परिषदेला सिरीफ फर्नांडिस, प्रताप म्हार्दोळकर, रूई आरावजो, ऍडवीन मास्कारेन्हास, संजय म्हालसेकर व चिखलीचे इतर ग्रामस्थ उपस्थित होते.