उपमुख्यमंत्री पायलटांकडून स्वपक्षीय सरकार लक्ष्य : काळीज पिळवटून टाकणारी घटना
वृत्तसंस्था/ कोटा
राजस्थानच्या कोटा शहरातील रुग्णालयात मृत्यमुखी पडलेल्या मुलांचा आकडा 35 दिवसांमध्ये 107 वर पोहोचला आहे. शुक्रवारी दोन तर शनिवारी सकाळी एका नवजात मुलीने अखेरचा श्वास घेतला आहे. उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी रुग्णालयाचा दौरा करत ही किरकोळ घटना नसून काळीज पिळवटून टाकणारी घटना असल्याचे म्हटले आहे. प्रशासन, रुग्णालय, सरकारमधील कुणीतरी यासाठी जबाबदार असल्याचे म्हणत पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची चांगलीच कोंडी केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही पीडित कुटुंबांची भेट घेतली आहे.
राज्य सरकारने घेतलेली भूमिका समाधानकारक नाही. उत्तरदायित्व आणि जबाबदारी ठरविणे आवश्यक असून अनेक कुटुंबांनी स्वतःचे मूल गमावले आहे. नऊ महिने गर्भात वाढविलेल्या बाळाला गमाविण्याचे दुःख माताच जाणू शकते. याप्रकरणी सरकारची प्रतिक्रिया अधिक संवेदनशील आणि सहानुभूतीपूर्ण असणे गरजेचे होते, असे म्हणत पायलट यांनी गेहलोत यांना लक्ष्य केले आहे. गेहलोतांनी दररोज मुलं मरतच असतात असे वादग्रस्त विधान केले होते.
13 महिने सत्तेत राहूनही त्रुटींसाठी पूर्वीच्या सरकारला लक्ष्य केल्याने कुठलाच तोडगा निघणार नाही. जनतेने काँग्रेसची निवड केली असून आम्हाला जबाबदारीला तोंड द्यावे लागेल असे पायलट यांनी म्हटले आहे. या विधानातूनही त्यांनी गेहलोतांनाच लक्ष्य केले आहे. गेहलोतांनी मुलांच्या मृत्यूसाठी वसुंधरा राजे यांचे शासन जबाबदार असल्याचा दावा केला होता.
हायपोथर्मिया कारणीभूत
राज्य सरकारने मुलांच्या मृत्यूप्रकरणी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यानुसार मुलांच्या मृत्यूचे मुख्य कारण हायपोथर्मिया आहे. रुग्णालयाच्या जवळपास सर्व उपकरणांमध्ये तसेच यंत्रणेत त्रुटी असल्याचे म्हटले गेले आहे.
71 पैकी 44 वॉर्मर नादुरुस्त
नवजातांचे तापमान 36.5 अंशापर्यंत असणे गरजेचे आहे. नर्सरीत वॉर्मरद्वारे तापमान 28 ते 32 अंशादरम्यान राखले जाते. रुग्णालयात 71 वॉर्मर असून यातील 44 नादुरुस्त आहेत. यंत्रणा खराब असल्याने तापमान खालावून नवजातांना हायपोथर्मियाची लागण झाली आहे.