वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुलांचे लसीकरण ऑगस्टमध्ये सुरू केले जाऊ शकते असे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी म्हटले आहे. संसदेत पार पडलेल्या भाजपच्या संसदीय बैठकीत मांडविया यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते.
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी मुलांचे लसीकरण करणे एक मोठे पाऊल ठरणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या तिसऱया लाटेच्या इशाऱयादरम्यान शाळा सुरू करण्यासाठी देखील लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुलांच्या लसीला सप्टेंबरपर्यंत मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन आणि जायडस कॅडिलाच्या लसींचे मुलांवर परीक्षण सुरू असल्याचे ते म्हणाले होते. फायजरच्या मुलांसाठीच्या लसीला अमेरिकेच्या एफडीएफने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. भारतासारख्या घनदाट लोकसंख्या असलेल्या देशात मुलांचे लसीकरण लवकरात लवकर होणे आवश्यक आहे.