पुणे / प्रतिनिधी :
इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींच्या फसवणूकीच्या घटना टाळण्यासाठी पालकांनी मुलांना सायबर गुन्ह्यांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या ऑनलाईन फ्रेंड्स वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे मत सहायक पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी पुण्यातील पिरंगुट, ता. मुळशी येथे महाराष्ट्र सायबर विभाग तसेच माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने “सायबर सेफ वूमन” विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांचा ‘सायबर सुरक्षा बाबतचा संदेश’ दाखविण्यात आला.
चव्हाण म्हणाले, वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर उघड केल्यामुळे बरेचदा गुन्हे घडले आहेत. यासाठी स्वतः ची माहिती, छायाचित्रे, पासवर्ड, ई मेल पोस्ट करण्यापूर्वी दक्षता घेणे गरजेचे आहे. सोशल माध्यमातून अनोळखी व्यक्तींकडून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट मुला-मुलींनी टाळायला हव्यात. सायबर गुन्हे घडू नयेत यासाठी सायबर सुरक्षा विषयी महिलांनी माहिती घ्यायला हवी.
कार्यशाळेत सायबर गुन्ह्यांचे स्वरुप, महिलांच्या बाबतीत घडणारे सायबर गुन्हे, महिलांनी घ्यावयाची दक्षता याबाबत सोदाहरणासह माहिती देण्यात आली. तसेच मोबाईल व इंटरनेटचा वापर करताना घ्यावयाची दक्षता, महिला सुरक्षा बाबतीत पोलीस प्रशासनाचे असणारे उपक्रम यांचीही माहिती देण्यात आली.