उत्तरप्रदेश सरकारची कारवाई
वृत्तसंस्था /गोरखपूर
उत्तरप्रदेशच्या गोरखपूर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयात मुलांच्या मृत्यूप्रकरणी योगी आदित्यनाथ सरकारने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी सरकारने आरोपी डॉक्टर कफील खान यांना बडतर्फ पेले आहे. खान यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.
4 वर्षांपूर्वी बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुलांचा मृत्यू झाला होता. खान यांच्या विरोधातील आरोपांसंबंधी एक समिती चौकशी करत होती. वैद्यकीय शिक्षण विभागाने आता मोठी कारवाई करत डॉक्टर खान यांना बडतर्फ केले आहे.
ऑगस्ट 2017 मध्ये गोरखपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 60 हून अधिक मुलांना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी डॉक्टर कफील समवेत 9 जणांवर आरोप ठेवण्यात आले हेत. स्वतःचे निलंबन रद्द करण्यासाठी कफिल यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनकडे धाव घेतली होती.
यापूर्वी चालू वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारने पुन्हा विभागीय चौकशी करण्याचा आदेश मागे घेतला होता. सरकारने याप्रकरणी 15 एप्रिल 2019 रोजी तपास अधिकाऱयाकडून दाखल अहवाल मान्य केला होता. या अहवालात डॉक्टर कफील खान यांना निर्दोष ठरविण्यात आले होते. कफील यांच्याविरोधात भ्रष्टाचार तसेच निष्काळजीपणाचे पुरावे मिळाले नसल्याचे अहवालात म्हटले गेले होते. यामुळे त्यांचे निलंबन रद्द होणार असल्याचे मानले जात होते. पण आता सरकारने मोठी कारवाई करत त्यांना बडतर्फ केले आहे.