शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांचे स्पष्टीकरण
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील शाळा सुरू करण्याच्या बाबतीत आपण अट्टहास बाळगलेला नाही, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू करण्याचा मुद्दा सरकारच्या प्रतिष्ठेचा नाही. मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शाळा सुरू करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे गृहकार्यालय कृष्णा येथे येडियुराप्पा यांची भेटी घेतली. त्यानंतर सुरेशकुमार यांनी मंत्री डॉ. के. सुधाकर यांची भेट घेतली. त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण आणि आरोग्य खाते समन्वय राखून काम करत आहे. प्रत्येक टप्प्यात आरोग्य खाते, मंत्री सुधाकर यांचे मार्गदर्शन आणि कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्या शिफारसींनुसार शिक्षण खाते काम करीत आहे, असे ते म्हणाले.
टीका करणाऱयांनी बेंगळूर शहराला केंद्रबिंदू मानून नव्हे; तर ग्रामीण भागातील परिस्थिती पाहून बोलावे. शाळा बंद असल्याने ग्रामीण भागात बालविवाह, बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. त्याला चाप लावण्याबरोबरच मुलांच्या शैक्षणिक हितासाठी आपण 1 जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे समर्थन त्यांनी केले.
शाळा सुरू केल्याच पाहिजे असा अट्टहास आपण धरलेला नाही. परिस्थितीची जाणीव आपल्याला देखील आहे, ग्रामीण विद्यार्थ्यांचे हित घेऊनच आपण निर्णय घेतला आहे. प्रसिद्धी माध्यमांनी केवळा बेंगळूरमधील परिस्थिती नजरेसमोर ठेवून वृत्त प्रसारण करू नये. अलिकडे न्यायालयानेही कोरोना नसणाऱया भागातील शाळा सुरू करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे, असेही सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले.