पाठीचा त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होउ लागला आहे. पण लहान मुले जेव्हा पाठ दुखीची तक्रार करतात तेव्हा त्याची तात्काळ तपासणी करणे गरजेचे आहे.
- बॅक पेन’ बरोबरच मुलाचे वजन कमी होत असेल किंवा पाय कमकुवत असेल, बाथरुमला अडचण येत असेल, झोपताना किंवा झोपेतून उठताना त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करायला हवी.
- प्रत्येक वेळी मणका हा पाठीच्या दुखण्याचे कारण असू शकत नाही. अन्य कारणे देखील असू शकतात.
- जवळपास 30 टक्के मुलांच्या पाठीच्या दुखण्याचे कारण हे शारिरीक रचनेतली विकृती असू शकते. वेळेतच एक्स रे काढल्यास किंवा काही बाबतीत स्कॅनिंग केल्यास पाठीच्या दुखण्याचे खरे कारण समजू शकते.
- रोजचा आहार पौष्टिक नसल्यामुळे स्पाइन इन्फेक्शनचा त्रास होऊ शकतो. पाठीच्या हाडांचा क्षयरोग होणे हा आजार अलीकडच्या काळात वाढला आहे. त्यामुळे काही गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.
- बसण्याची पद्धत लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांची बसण्याच्या चुकीच्या सवयीमुळे पाठीचा त्रास होतो. आपल्या पाठीला ते स्प्रिंगमाणे गृहित धरतात आणि कसेही बसतात. त्यामुळे कालांतराने पाठदुखीचा त्रास होतो. दुचाकीवर वाकून बसल्याने पाठीचा आजार बळावतो.
- नियमित व्यायाम : दररोज व्यायाम केल्याने किंवा खेळल्याने तब्येत सुदृढ राहते. मुलांनी वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग आदींची सवय लावून घ्यावी. त्यामुळे पाठीचा त्रास होत नाही.
- आहाराच्या सवयी : लहान वयात अधिक वजन असणे देखील हानीकारक आहे. अधिक वजन असल्याने मणक्यावर जास्त ताण पडतो. त्यामुळे काही वर्षांनी पाठीचे दुखणे सुरू होते. भरपूर खाणे किंवा खूपच कमी खाणे या दोन्ही सवयी शरिराला पोषक नाहीत. त्यामुळे मुलांच्या आहाराचे वेळापत्रक तयार करायला हवे. यात पौष्टिक अन्नावर भर असावा.
- स्कूल बॅगचे वजन : स्कूलबॅगमध्ये नोटबुक, बुक आदी गोष्टी ठासून भरल्या जात असल्याने काही वेळा मुलाच्या वजनापेक्षा त्याचे वजन जास्त होते. बॅगेचे वजन कमी करुन पाठदुखीचा त्रास कमी करता येऊ शकतो. दररोज लागणारी पुस्तके शाळेच्या लॉकरमध्ये ठेवता येतात. गरजेनुसार होमवर्कसाठी पुस्तक घरी आणता येऊ शकतात. त्यामुळे बॅगचे वजन की होऊ शकते.
- शारिरीक विकास : मुलाचा शारिरीक विकास चांगला होण्यासाठी त्याला सातत्याने पौष्टिक आणि सात्विक आहार देणे गरजेचे आहे. पौष्टिक आणि ताजी फळे सालासहित, तसेच भाजीपाला दिल्याने त्याच्या शरिरात जीवनसत्त्वाचे, कॅल्शियमचे प्रमाण संतुलित राहील. परिणामी, त्याला पाठदुखीप्रमाणेच अन्य आजाराचा सामना करावा लागणार नाही.
– डॉ. संजय गायकवाड