वार्का खून प्रकरणाचा तपास लागला : घरातील वादातून खून झाल्याचा अंदाज खरा ठरला
प्रतिनिधी /मडगाव
वार्का येथे आपल्या घरी एकटाच राहणाऱया त्रिनिदाद मार्टिन्स (80) या वृद्धाचा खून त्याचीच मुलगी ज्युबेल मार्टिन्स (37) हिनेच केल्याचे उघड झाले असून कोलवा पोलिसांनी तिला अटक केली आहे. या खून प्रकरणात कोलवा पोलिसांनी सुरुवातीपासून मयताच्या मुलीवरच संशय व्यक्त केला होता. परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे तिला काल अटक करण्यात आली.
हे खून प्रकरण गुरुवारी रात्री घडले होते. त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली होती. मयत त्रिनिदाद मार्टिन्स यांची मुलगी ज्युबेल मार्टिन्स हिला सर्व प्रथम चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. तिच्याकडून बरीच माहिती पोलिसांनी गोळा केली होती. तिनेच हा खून केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे जमा होताच तिला अटक करण्यात आली.
या खून प्रकरणात अन्य कुणाचा सहभाग आहे का ? याचा देखील तपास सध्या कोलवा पोलीस करीत आहेत. ज्युबेल एकटीच हा खून करू शकते का की तिच्यासमवेत अन्य कुणाचा सहभाग असावा यादृष्टीने सध्या तपास सुरू आहे. वडील त्रिनिदाद व मुलगी ज्युबेल यांचात घराच्या मालमत्तेवरून वाद होता. आपले वडील घर एका धर्मदायी संस्थेला देण्याच्या तयारी असल्याने ती भडकली होती.
ज्युबेल ही त्रिनिदाद मार्टिन्स यांची एकुलती एक मुलगी. तिचे वडिलांशी पटत नसल्याने ती वेगळी राहते. तिचा व वडिलांचा घराच्या मालकीवरून वाद होता. आपण राहत असलेले घर मुलीला न देता, ते धर्मदायी संस्थेला दान करण्याच्या तयारीत होते व काही दिवसांपूर्वी या घराची व सभोवतालच्या जमिनीची मोजणी करून गेले होते.
मार्टिन्स यांच्या डोक्यावर लोखंडी सळीने प्रहार करून त्यांचा खून करण्यात आला होता. मयताच्या तोंडावर आणखीन जखमा आढळून आल्या होत्या. मार्टिन्स यांचा खून करण्यात आलेले घर हे भर लोकवस्तीत असून खून केल्यानंतर आरोपी कसा काय पसार झाला याबद्दल स्थानिक लोक देखील आश्चर्य व्यक्त करीत होते. खून झाला त्या दिवशी संध्याकाळी मार्टिन्सच्या शेजाऱयांनी त्यांना घराच्या व्हरांडय़ात पाहिले होते. काही वेळानंतर त्याच्या घरातून वादावादी चालू असल्याचा आवाज येत होता. हा वाद त्यांची मुलगी ज्युबेल मार्टिन्स हिनेच घातला होता. त्यानंतर हा खुनाचा प्रकार घडला होता.
त्रिनिदाद मार्टिन्स हे घरात एकटेच राहत होते. स्वतःची मुलगी सोडली तर इतर कुणाकडेही त्यांचा वाद नव्हता. आपले घर मुलीला न देता धर्मदायी संस्थेला देण्याचा निर्णय त्यांनी घेतल्याने वाद विकोपाला गेला होता.