आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम येथे घडलेली ही अनोखी घटना आहे. 2019 मध्ये अप्पला राजू आणि भाग्यलक्ष्मी या जोडप्याच्या दोन मुली नौका अपघातात मृत्युमुखी पडल्या. या जोडप्यावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला. 15 सप्टेंबर 2019 ला ही दुर्घटना घडली होती. त्यानंतर ठिक दोन वर्षांनी म्हणजे 15 सप्टेंबर 2021 या दिवशी या जोडप्याला जुळय़ा मुलांची प्राप्ती झाली.
या जोडप्याने गमावलेल्या मुली अनुक्रमे 1 आणि 3 वर्षांच्या होत्या. त्या गोदावरी नदीतून नौकेतून त्यांच्या आजीबरोबर प्रवास करीत होत्या. नौकेला अपघात होऊन ती बुडाल्यामुळे या तिघींचाही त्यात मृत्यू झाला होता. त्या अपघातात अन्य 50 प्रवासीही मृत्युमुखी पडले होते. दोन्ही मुली गमावल्यामुळे हे जोडपे निराशेच्या गर्तेत लोटले गेले होते. जीवनातील त्यांचे स्वारस्यच संपले होते. तथापि, आता त्यांना दोन जुळय़ा मुलांची प्राप्ती झाल्यामुळे त्यांच्या जीवनातील आनंद पुन्हा परतला आहे. राजू आणि भाग्यलक्ष्मी दोघेही काच उत्पादनाच्या कारखान्यात कामाला आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. ‘देवाने दोन मुली हिरावून घेतल्या, पण दोन मुलांचा प्रसाद पदरात टाकला’, अशी भावूक प्रतिक्रिया भाग्यलक्ष्मी यांनी व्यक्त केली आहे.
त्यांना झालेल्या जुळय़ा मुलांची प्रकृती उत्तम असून त्यांचे वजनही समाधानकारक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दोन मुलगे झाल्याने त्या जोडप्याचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे.