विद्यार्थ्यांच्या चेहऱयावर वेगळाच आनंद, विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे विशेष स्वागत, कॉलेज परिसरदेखील गजबजला,
प्रतिनिधी /बेळगाव
अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी शाळेची घंटा वाजली आणि शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट ऐकून शाळा आनंदली… असे काहीसे वातावरण प्रत्येक शाळेच्या आवारात पहायला मिळाले. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंदही ओसंडून वाहत होता. आपल्या मित्र -मैत्रिणींसोबत पुन्हा एकदा दंगामस्ती करत शाळेत अभ्यास करायचा असल्याने चेहऱयावर वेगळाच उत्साह होता.
कोरोना आल्यापासून विद्यार्थ्यांना धोका उद्भवू नये, यासाठी शाळा बंद करण्यात आल्या. ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे कशाबशा परीक्षा पार पडल्या. त्यानंतर पुन्हा एकदा हायस्कूलचे वर्ग भरविण्यात आले खरे, परंतु तितक्मयात कोरोनाची दुसरी लाट आली आणि पुन्हा एकदा ऑनलाईन वर्ग भरविण्यात आले. यामुळे शाळा आणि विद्यार्थी हे एकमेकांपासून दूर होते. राज्यातील कोरोना आटोक्मयात असल्यामुळे राज्य सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून बेळगावसह राज्यात करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने आठ दिवसांपासूनच शाळा व्यवस्थापनांकडून सर्व व्यवस्था करण्यात येत होती. एका वर्गात 20 विद्यार्थी बसतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक अंतर तसेच विद्यार्थी एकमेकाजवळ येणार नाहीत याची खबरदारी शाळा व्यवस्थापनाने घेतली आहे. सोमवारी सकाळच्या सत्रात बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले. यामुळे कॉलेज परिसरदेखील बऱयाच दिवसानंतर गजबजला. ऑफलाईन वर्ग भरल्याने कॉलेज विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा ‘दुनियादारी’ सुरू झाली.
फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत
विद्यार्थी बऱयाच दिवसानंतर शाळेत आल्याने त्यांचे विशेष असे स्वागत करण्यात आले. टिळकवाडी येथील जी. जी. चिटणीस स्कूलमध्ये शाळा परिसरात दाखल होणाऱया विद्यार्थ्यांवर फुलांची उधळण करण्यात आली. याचबरोबर सरदार्स हायस्कूल येथे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी अनोखा उपक्रम राबविला. शानभाग स्कूल, ठळकवाडी हायस्कूल, हेरवाडकर स्कूल, बालिका आदर्श विद्यालय, मराठा मंडळ हायस्कूल, शेख स्कूल येथेही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
पहिल्याच दिवशी 60 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती
शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती थोडी कमी होती. पहिल्याच दिवशी शाळांमध्ये सरासरी 60 टक्के विद्यार्थी उपस्थित होते. रिक्षाची व्यवस्था नसल्याने बरेच विद्यार्थी पहिल्या दिवशी शाळेत येवू शकले नाहीत. येत्या दोन दिवसात 80 ते 85 टक्के उपस्थिती होईल, असा अंदाज शाळा व्यवस्थापनाकडून व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क सक्तीचा करण्यात आला होता. तसेच वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण केले जात होते. त्यामुळे आता शाळेचे इतर वर्गही सुरू करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ातील शाळा-कॉलेज
- हायस्कूल – 487
- पदवीपूर्व कॉलेज – 141