ऑनलाईन टीम / मुंबई :
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तसे संकेतही दिले होते. याच दरम्यान, शुक्रवारी भाजप नेत्यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. त्यामुळे राजू शेट्टी भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजू शेट्टी भाजपमध्ये येणार अशी चर्चा आहे. पण अद्याप यासंदर्भात आमचं कोणतंही बोलणं झालं नाही. मुळातंच ते आमच्यासोबत होते. पण काही कारणास्तव ते महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले, राजू शेट्टी मुळातच आमच्यासोबत होते. पण काही कारणास्तव ते महाविकास आघाडीत सामील झाले. आता त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये सामील होणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्याच्यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य नाही.