कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकारण तापू लागले; भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांच्या भूमिकेवर नजरा
कोल्हापूर / संजीव खाडे
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे 2 डिसेंबरला निधन झाले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय शोकसभेत राष्ट्रवादीचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पोटनिवडणुकीत आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी भाजपने पुढाकार घ्यावा, तीच आमदार जाधव यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विधान करत यॉर्कर टाकला. त्यानंतर आता सव्वा महिन्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी जाधव कुटुंबीय मूळचे भाजपचेच आहे. जयश्री जाधव यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढावी, अशी ऑफर देत गुगली टाकली. त्यामुळे जाधव यांच्या रूपाने पोटनिवडणुकीत एक उमेदवार निश्चित झाला आहे. मात्र राजकीय पक्षांच्या भूमिकेविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाला सव्वा महिना लोटल्यानंतर आता रिक्त जागी पोटनिवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. काँग्रेसकडून आमदार जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यासंदर्भात काँग्रेस नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याबरोबर त्यांचा संवादही झाल्याचे सांगितले जाते. आमदार जाधव यांच्या अकस्मिक निधनामुळे शहरात जाधव कुटुंबीयांबद्दल सहानुभुतीचे वातावरण आहे. त्यामुळे त्याचा लाभ घेण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू आहेत.
त्याची सुरूवात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महिन्यापूर्वीच भाजपवर यॉर्कर टाकत केली होती. पण त्यावेळी भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नव्हती. पण बुधवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनीही गुगली टाकताना जाधव कुटुंबीयांचे भाजपशी असणारे नाते विषद करत भाजप त्यांना उमेदवारी देण्यास तयार आहे. त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढावे, असे आवाहन केले. त्यावर जाधव परिवाराने प्रतिक्रिया दिलेली नाही. गुरूवारी चंद्रकांतदादा पाटील यांनी जयश्री जाधव यांची भेट घेतल्याने पुन्हा कोल्हापूर उत्तरच्या राजकारणाला वेग आला आहे.
भाजपची भूमिका निश्चित पण सस्पेन्स कायम
भाजप आणि शिवसेना युती असल्यापासून कोल्हापूर उत्तर अर्थात शहरची जागा भाजपच्या वाटय़ाला कधीही आली नव्हती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-शिवसेना युती तुटली होती. त्यावेळी चारही पक्ष स्वतंत्र लढले होते. त्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमध्ये भाजपचे उमेदवार महेश जाधव यांनी 42 हजारहून अधिक मते मिळाली होती. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेना विरूद्ध काँग्रेस सामना झाला. त्यात आमदार चंद्रकांत जाधव काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार नसल्याने भाजपचा उमेदवार प्रतिस्पर्धी असणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या सतेज पाटील यांना बाय देताना माजी आमदार अमल महाडिक यांना माघार घ्यायला लावले होते.
पण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजप काँग्रेसला पुढे चाल देत निवडणूक बिनविरोध करणार की आपला स्वतंत्र उमेदवार देणार? याची चर्चा आहे. जयश्री जाधव यांना उमेदवारीची ऑफर द्यायची. त्यांनी नकार दिल्यास भाजपचा उमेदवार द्यायचा, अशी व्यूहरचना असू शकते. भाजपच्या कार्यकर्त्यांतही पोटनिवडणूक लढवून 2024 चे मैदान तयार करावे, असा मतप्रवाह आहे. सत्यजित कदम यांच्यासह इतर काही नावांची चर्चाही सुरू झाली आहे. जयश्री जाधव यांनी नकार दिल्यास राज्याची कोअर कमिटी निर्णय घेईल, असे सांगत चंद्रकांतदादांनी उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. त्यामध्ये जाधव यांच्याविषयी सहानुभुती दर्शविण्याची दक्षता घेतली आहे. चंद्रकांतदादांच्या गुगलीला काँग्रेस कसे रिऍक्ट होते, हे लवकरच कळणार आहे.
काँग्रेसचा निर्णय पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर
पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्याची जबाबदारी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील मित्र पक्षांना बरोबर घेऊन त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. पालकमंत्र्यांनी उमेदवारीबाबत जाहीर भाष्य केलेले नाही. पण त्यांच्या गोटात तयारी सुरू आहे. कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या नस जाणणारे पालकमंत्री पाटील भूमिका कधी जाहीर करतात, यावर पुढील सर्व गोष्टी ठरणार आहेत.
जाधव कुटुंबीय निर्णयाकडे लक्ष
जयश्री जाधव या उमेदवारी देण्यास काँग्रेस आणि भाजप तयार आहेत. त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात असली तरी त्या कोणत्या पक्षाकडून लढणार? याकडे कोल्हापूरच्या मतदारांचे लक्ष असणार आहे.