भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांचा सवाल
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेबांना काय झाले हे कळत नाही. ते काहीही झाले तरी ते भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यामुळेच झाले, असे म्हणतात. त्यांना चंद्रकांतदादांची ऐवढी भीती वाटते?, असा सवाल भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केला.
महानगर भाजपच्या वतीने थेट पाईप लाईनच्या कामासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चिकोडे म्हणाले, मुश्रीफसाहेबांचा काय प्रॉब्लेम आहे, हेच काळत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीत चंद्रकांतदादाच का दिसतात?हेच कळत नाही. त्यांना चंद्रकांतदादांची एवढी भीती का वाटते? हे शोधावे लागेल. थेट पाईपलाईनच्या कामाला ठेकेदार कंपनीमुळे उशिर झाल्याचे सांगत मुश्रीफांनी कोल्हापूरच्या जनतेची माफी मागितली. आपल्या अपयशाचे खापर ते ठेकेदारावर फोडत आहेत. पाणी वाढू लागल्यानंतर बुडू नये, म्हणून माकडिन जशी पिल्लाला पायाखाली घेते, तसाच प्रकार थेट पाईपलाईन योजनेच्या ठेकदाराबाबत मंत्री महोदय करत आहेत, असा टोला चिकोडे यांनी लगावला.
अहमदनगर पालकमंत्री फिरकलेले नाहीत
मुश्रीफ अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. कोरोनाच्या संकटात ते तीन तीन महिने त्या जिल्हÎात फिरकलेले नाही, तेथील जनता ओरडत आहे, अशी टीकाही चिकोडे यांनी केली.