लिंगीवरे-राजेवाडी पुल पाण्याखाली : मोटारसायकल वाहून गेली
वार्ताहर/दिघंची
बुधवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने माणगंगा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे. दिघंची येथील माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. लिंगीवरे-राजेवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्याने राजेवाडीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. तर आटपाडी-पिंपरी खुर्द पुलही पाण्याखाली गेला आहे. याठिकाणी एका युवकाची मोटारसायकल वाहून गेली. परंतु सुदैवाने त्याचे प्राण वाचले.
माणगंगा पात्रात झालेल्या मुसळधार पावसाने मागील आठवडय़ात ब्रिटिशकालीन राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. पुन्हा एकदा बुधवारी रात्री वादळी मुसळधार पाऊसने हजेरी लावल्याने माणगंगा नदीच्या पात्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयाला मिळाले. यामध्ये लिंगीवरे-राजेवाडी रस्त्याचा पुल पाण्याखाली गेला. त्यामुळे राजेवाडीकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे.तर एका युवकाची मोटारसायकल याठिकणी पाण्यात वाहून गेली. सुदैवाने युवकाचे प्राण वाचले. पुलावरून पाणी वाहत असल्याने काळामळा, राजेवाडी या गावांकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली.
राजेवाडी तलाव भरल्यानंतर वाहून जाणारे पाणी माणगंगा नदीच्या दिघंची पात्रात येते. त्यामुळे दिघंची मधील माणगंगा नदी दूथडी भरून वाहू लागली आहे. एरव्ही कोरडे ठणठणीत पात्र असलेल्या माणगंगा नदी दुथडी भरून वाहत असलेले समाधानकारक चित्र बघण्यासाठी दिघंचीमधील नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती.पाऊसाने माणगंगा नदी, राजेवाडी तलाव, महाडिकवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचे समाधानकारक चित्र असले तरी शेतकऱयांच्या पिकांचे देखील मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.