वार्ताहर/ उचगाव
मंगळवार दि. 6 ऑगस्ट 2019 रोजीच्या गतवर्षीच्या पुराचा विळखा पडून सर्वत्र हाहाकार माजला होता. त्याची पुनरावृत्ती यावर्षी होते की, काय याचीच धास्ती संपूर्ण नागरिक आणि शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे.
गेल्या दोन-चार दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने पावसाचा जोर पाहता घरातून बाहेर पडणेदेखील अवघड झाले आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच नाले तुडुंब भरून वाटू लागले आहेत. नाल्यांचे पाणी शेतवडीत शिरल्याने तसेच नाल्याच्या जोरदार पाण्याच्या माऱयाने शेतवडीतील बांध फुटून पाण्याबरोबर वाहत येत असलेल्या गाळामध्ये शेतवडीतील पिके गेल्याने तसेच मार्कंडेय नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये सध्या भात रोप लागवड करण्यात आली आहे. सध्या मार्कंडेय नदीला पूर आल्याने नदी काठचा भाग जलमय झाला आहे. नुकताच लागवड केलेली भात रोपे पाण्याखाली गेली आहेत. तर पाण्याच्या जोरदार प्रवाहाने काही भागातील शेतकऱयांनी लागवड केलेली भातरोपे वाहून गेली असल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात येत आहे. तसेच पावसाचा जोर जर असाच वाढला तर पिके कुजण्याची भीती शेतकरी वर्ग व्यक्त आहेत.
राकसकोप धरणाचा पिकांना फटका
पश्चिम भागामध्ये राकसकोप धरण आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग या भागातील शेतकरी व नागरिकांना होणे आवश्यक आहे. मात्र, तो होत नाही त्यामुळे धरण शेतकरी वर्गाला नेहमीच मारकच ठरते. या धरणातील पाणी जर उन्हाळय़ात मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडले तर हजारो एकर जमीन ओलीताखाली येईल आणि भरघोस पिके येतील. मात्र, या पाण्याचा उपयोग शेतीला कधीच होत नाही. उलट पावसाळय़ात धरण भरले की अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडले जाते. अशातच पावसाचे पाणी तसेच नाले, ओढे यांचे पाणी नदी पात्राकडे येत असल्याने पूर येऊन परिसरातील सर्व पिके पाण्याखाली जातात. व नुकसान होते. तीच परिस्थिती आता निर्माण झाली.
गतवर्षी पुराने यावर्षी कोरोनाने मोठे नुकसान
गतवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ामध्ये मुसळधार पावसाने दाणादाण उडविली होती. संपूर्ण शेतवडी जलमय झाली होती. संपूर्ण पिके पाण्याखाली राहिल्याने कुजून व माळ जमिनीतील खरीप पिके पावसाच्या माऱयाने खराब झाली. नदीकाठाची पिके गाळात गाढून गेली होती. यामुळे शेतकरी वर्गाला अतोनात नुकसान सोसावे लागले होते. तर यावर्षीच्या रब्बी हंगामातील सर्व पिके जोमात आली. मात्र कोरोनाच्या विळख्य़ात अडकल्याने बाजारपेठ बंदचा फटका बसून शेतातच तयार झालेली सर्व पिके कुजून यावर्षी मोठा फटका शेतकरी वर्गाला बसला आहे. यातून सावरत असतानाच आता पुन्हा निसर्गाच्या चक्रात शेतकरी अडकतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.