काही पिक्चर हे क्लासिक म्हणावेत असे असतात. त्यांच्या कथेमुळे किंवा त्यातल्या पात्ररचनेमुळे असतील पण कुटुंबासहित ते पाहणं हा एक आनंद असतो. ‘परिचय’ हा जुना सिनेमा यापैकी एक. कथावस्तू अत्यंत सुंदर! गाणी त्याहून अधिक सुंदर! मग ते ‘बीती ना बिताई रैना’ असो किंवा ‘सारे के सारे’ असो. पण सुरवातीला असलेलं हे ‘मुसाफिर हूँ यारों’ मन वेधून घेतं. आयुष्य म्हणजे एक प्रवास आणि हा प्रवासी मात्र भटक्मया म्हणावा असाच. जितेंद्र वर चित्रित झालेलं हे सुरेख गीत लिहिलंय ऑल द ग्रेट गुलझार यांनी. गायकही तेवढेच महान..आपले प्रिय किशोरकुमार! पण फिरस्त्यांची जिंदगी काय असेल असा प्रश्न यानिमित्ताने आपल्याला सतावत राहतो. ज्याला ठावठिकाणा नाही असा एक प्रवास आणि ज्याला आपल्या ठावठिकाणी जाताच येत नाही, गेलं तरी रहाताच येत नाही असा एक प्रवास. संजीवकुमारचं ट्रक ड्रायव्हरच्या भूमिकेतलं गाणं ऐका. ‘नमकीन’ मधलं.
राहों पे रहते हैं, यादों पे बसर करते है
खुश रहो अहले वतन, हो हम तो सफर करते हैं..
दोन्हीही गाण्यांचे कवी आणि गायक तेच आहेत. मस्त वाटतं गाणं ऐकताना. संजीवकुमार यांचा चेहरा इतका बोलका आहे आणि त्यांनी ते ड्रायव्हरपण अशा बेमालूमपणे कॅरी केलंय की वा भई वा! प्रवासी असो वा सारथी, एकदा का गतीवर स्वार झाले की थांबेपर्यंत ठेका सुटत नाही. मग तो टांग्याचा असो किंवा ट्रकचा. आणि विशेष वाटतं ते या दोन्ही गाण्यांच्या बाबतीत केलेल्या गतियोजनेचं. म्हटलं तर दोन्ही गाण्यांचा ठेका सेम. पण एकात घोडय़ाच्या टापा आणि दुसऱयात ट्रकने घेतलेली सफाईदार वळणं स्पष्ट दिसतात. हा वेगळेपणा जपणाऱयाला मान लिया. उगीच नाही आजही लोक ही जुनी गाणी ऐकत! बाकी प्रवास आणि गाणी यांचं काय नातं आहे कुणास ठाऊक. पण प्रवास सुरू झाला रे झाला की गाणं चालू झालंच म्हणून समजावं. मग ती सहल असेल आणि गाण्याच्या भेंडय़ा खेळल्या नाहीत तर फाउलच धरत असावेत. एकटय़ा माणसाला गाडीत कंटाळा येऊ नये म्हणून, ड्रायव्हरला झोप येऊ नये म्हणून, प्रवासात गाणी ऐकायला मज्जा येते म्हणून, लोकांची बडबड ऐकायला नको असते म्हणून, रोज अपडाउन करणाऱयांचा छंद म्हणून, प्रिय व्यक्तीच्या सहवासाची मजा वाढावी म्हणून, अशी कारणं म्हणावीत तर अनंत आहेत. पण हे झालं प्रवास आणि गाणी यांचं नातं. प्रवास या विषयाला धरून लिहिलेल्या गाण्यांचं काय?
तर मित्रांनो या विषयावर असंख्य गाणी आहेत. अगदी पहिलं पाऊल ते शेवटचं पाऊल पडेपर्यंतची अशी हजारो गाणी आहेत. प्रवासाची ओढच माणसाला इतकी असते की गावाला जायचं म्हटल्यावरच उत्साह टिपेला पोहोचतो. गेल्या दोन तीन पिढय़ांच्या उन्हाळी सुट्टय़ांची कॉमन सुरुवात करणारं गाणं
झुकझुक झुकझुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया ऐकलं की मोठय़ांना अजूनही लहान व्हावंसं वाटतं की नाही? तर कधीतरी आपल्याला आयुष्याच्या मार्गावरून एकटय़ानेच चालावं लागतं. आणि तेव्हा ‘हा माझा मार्ग एकला, शिणलो तरीही चालणे मला’ असंही म्हणावं लागतं. राजा परांजपे यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं ‘हा माझा मार्ग एकला’ याच सिनेमामधलं आहे. ज्या सिनेमामध्ये हा जो नायक आहे त्याच्या आयुष्याचा प्रवास एकटय़ाचा आहे. त्याच्या आयुष्याचा एकटेपणा दर्शवणारं हे गाणं आहे. थोडक्मयात कोणाच्या वतीने कोणत्या प्रकारचा प्रवास यावा हे काही ठरलेलं नसतं. तो ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग असतो पण प्रवास मात्र अटळ असतो. आयुष्य हा एक प्रवास आहे असं मानलं तर हा असा प्रवास असतो की ज्यामध्ये एकदा येऊन गेलेला गाव परत येत नाही. जसं राजेश खन्ना राजेश खन्नाच्या
जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम
वो फिर नही आते
असं तो म्हणतो. तर कधी असंही म्हणतो, की
जिंदगी का सफर, है ये कैसा सफर
कोई समझा नही, कोई जाना नहीं
है ये कैसी डगर, चलते है सब मगर
कोई समझा नही, कोई जाना नही
आयुष्याचा प्रवास असाच असतो. आपण कुठून चाललो, कुठे चाललोय, कुठून आलो आणि जाणार तरी कुठे, हे समजेपर्यंत आयुष्य संपायला आलेलं असतं पण या आयुष्याच्या प्रवासाने माणसाला घातलेली कोडी मात्र संपत नाहीत. कदाचित म्हणूनच संगीतकार गायक लेखक आणि फिल्म इंडस्ट्री यांना प्रवास या विषयावर गाणे करण्याचा मोह आवरत नसावा. आपली सगळी धडपड कशासाठी असते तर आयुष्यात थोडा तरी सुकून मिळावा थोडी शांतता मिळावी रोजच्या कटकटीपासून सुटका मिळावी यासाठीच तर आपण राहतो ते ठिकाण सोडून सारखे फिरत असतो. सुखाच्या शोधात. म्हणून जेव्हा कुणीतरी आपल्याला असं म्हणतं,
आ चल के तुझे मैं लेके चलूँ ऐसे गगन के तले
जहाँ गम भी न हो आसू भी न हो बस प्यार ही प्यार पले, तर कधीकधी हा प्रवास जन्मोजन्मी सुरूच राहतो. कसा म्हणाल तर, ‘तू जहाँ जहाँ चलेग मेरा साया साथ होगा’ असं म्हणत. कधीकधी मात्र हा प्रवास कष्टदायक असतो की
‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे
पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे’
असं म्हणायची वेळ येते. कारण काही प्रवासांत वेळ अशी वाईट असते की
गाव मागचा मागे पडला, पायतळी पथ तिमिरी बुडला , ही घटकेची सुटे सराई , मिटले दरवाजे
अशी अवस्था असते. इकडून आधार नाही तिकडूनही आधार नाही, पण प्रवास करणं मात्र सुटत नाही. शाश्वती कशाचीच नसते, थांबता येत नाही, नाही पुढे जाता येत. कसला हा प्रवास? काही प्रवास हे मात्र मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाणारे! हा मोह संत तुकारामांनाही आवरता आला नाही.
जाऊ देवाचिया गावा घेऊ तेथेच विसावा
देवा सांगू सुख दुःख देवनीवारील भूक
तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लडिवाळे
असं म्हणून तुकाराम महाराज आपण आता देवाच्या गावाला जाणार असल्याचा आनंद व्यक्त करताना दिसतात. आयुष्याच्या ह्या प्रवासात देवा इतका सच्चा सख्खा, साथी, सोबती कोण असतो?
कधी कधी राहों में उन से मुलाकात हो गयी
जिसे डरते थे वो ही बात हो गई
असं होतं. तर कधी ‘साताऱयाला जाता जाता बुगडी सांडते’! हे प्रवास खरे गमतीचे. सगळय़ात दणक्मयात गाजलेला प्रवास मात्र ‘दे धक्का’ चा!
चल बाई चल पाऊल उचल
मारायची हाय तुला मोठी मजल
अंथरुण पांघरुण थंडीला कांबरुण
पासून, चहापत्ती साखरपूड टमरेल भगोनं
घेऊन, थांबायचं न्हाय गडय़ा थांबायचं न्हाय
म्हणत म्हणत
वाट दिसू द्ये गा द्येवा वाट दिसू द्ये
गाठ सुटू द्ये गा द्येवा वाट दिसू द्ये
असा हा प्रवास! न थांबणारा!
-अपर्णा परांजपे-प्रभू