काश्मीर मुद्दय़ावर चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट
इस्लामाबाद/ वृत्तसंस्था
आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या विरोधात वातावरणनिर्मिती करू पाहणाऱया पाकिस्तानला पुन्हा झटका बसला आहे. ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या (ओआयसी) बैठकीच्या अजेंडय़ात काश्मीरचा मुद्दा समाविष्ट नाही. ओआयसीच्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांची चांगलीच फजिती झाली आहे. मुस्लिमांशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा करणार असून यात जम्मू-काश्मीर वाद सामील असल्याची घोषणा कुरैशी यांच्या कार्यालयाने बुधवारीच केली होती.
ओआयसीने अधिकृत वक्तव्ये प्रसिद्ध केली असून यात काश्मीर मुद्दय़ाचा कुठलाच उल्लेख नाही. विदेशमंत्र्यांच्या बैठकीत ‘दहशतवादाच्या विरोधात शांतता आणि विकासासाठी एकजूट’ या शीर्षकाखाली होणार असल्याची माहिती ओआयसीचे महासचिव ओथाईमीन यांनी दिली आहे.
पाकिस्तानची फजिती
भारत सरकारकडून कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर जम्मू-काश्मीरमधील मानवाधिकार तसेच मानवी स्थितीवर कुरैशी चर्चा करणार असल्याचे पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने म्हटले होते. पाकिस्तानचे सद्यकाळात सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याशी संबंध बिघडलेले आहेत. सौदी अरेबियाने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करण्यास सांगितले आहे. तर संयुक्त अरब अमिरातने पाकिस्तानच्या नागरिकांना व्हिसा देणेच थांबविले आहे.