भाजपच्या विजयोत्सवात सहभागी झाल्याने खून केल्याचा आरोप
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या प्रकरणामध्ये कसून तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील गटबाजीतून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निवडणूक काळात हत्या झालेल्या तरुणाने भारतीय जनता पार्टीचा प्रचार केल्याने आणि निकालानंतर विजयोत्सवात सहभागी झाल्याने त्याच्यावर हल्ला झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय तरुणाचा मृतदेह ताब्यात घेण्यासही कुटुंबियांनी नकार दिला आहे. अखेरीस या प्रकरणामध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत चौकशीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिह्यामधील 25 वषीय बाबर अली या तरुणाचा रविवारी मृत्यू झाला. भाजपाच्या प्रचारामध्ये तसेच विजयानंतरच्या विजयोत्सवाच्या रॅलीमध्ये सहभागी झाल्याच्या कारणावरुन 20 मार्च रोजी बाबरला बेदम मारहाण झाली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबरचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. रविवारी बाबरचा मृतदेह त्याच्या गावी नेण्यात आला तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. दोषींवर कारवाई केल्यानंतरच अंत्यसंस्कार करणार असल्याची ठाम भूमिका कुटुंबीय-नातेवाईकांनी घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिल्याचे ट्विट केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या तरुणाच्या नातेवाईकांप्रती शोक संवेदनाही व्यक्त केल्या.