नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मूडीज इन्व्हेस्टर सर्व्हिस या संस्थेने भारताच्या गुंतवणूक पतमानांकनात घट केली आहे. आतापर्यंत मानांकन बीएए 2 असे होते. आता ते बीएए 3 असे करण्यात आले आहे. 22 वर्षांनंतर प्रथमच भारताचे मानांकन याप्रकारे घटविण्यात आले आहे. भारताला हा एक इशाराच असल्याचे मानण्यात येत आहे.
प्रथम भारताचे पतमानांकन 1998 मध्ये घटविण्यात आले होते. त्यानंतर 2017 मध्ये ते बीएए 2 या पातळीपर्यंत वाढविण्यात आले होते. तेव्हापासून ते बीएए 2 याच पातळीवर होते. आता कोरोना परिस्थितीमुळे करण्यात आलेला लॉकडाऊन व त्यामुळे घटलेले उत्पादन यामुळे मानांकनात घट करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे. भारताने अद्याप मूडीजच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. भारतातील वित्तीय व्यवस्थेची घसरण आणि भारतात गुंतवणूक करण्यासंबंधीची जोखीम या संबंधीचे हे मानांकन आहे.
मानांकन घटविल्याने भारताला यापुढच्या काळात सावधगिरीने पावले उचलावी लागणार आहेत. हे मानांकन आणखी घटल्यास भारतात गुंतवणूक करणे विदेशी वित्तसंस्थांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे. पुष्कळशा विदेशी वित्तसंस्था मूडीजच्या मानांकनाला विश्वासार्ह मानतात. त्यामुळे हे मानांकन दीर्घकाळ राहणे भारताच्या आर्थिक भवितव्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे, असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले. मूडीजने भारताच्या चलन पतमानांकनातही घट केली असून तेही बीएए 2 वरून बीबीए 3 वर आणण्यात आले. तर अल्पकालीन चलन मानांकनात पी 2 वरून पी 3 अशी घट केली आहे.