आसनसोल येथील प्रचारसभेत मोदींचा घणाघात
पश्चिम बंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसनसोल येथील प्रचारसभेला संबोधित केले आहे. या सभेत मोदींनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला आहे.
मृतदेहांवर राजकारण करण्याची ममता बॅनर्जी यांना खूपच जुनी सवय असल्याची टीका मोदींनी केली आहे. एका ध्वनिफितीत ममता बॅनर्जी सीतलकूची येथील तृणमूल उमेदवाराला सीआयएसएफच्या गोळीबारात मारले गेलेल्या 4 जणांचा मृतदेहासह रॅली काढण्याची सूचना करत असल्याचे ऐकू येते. तर तृणमूलने ही ध्वनिफित बनावट असल्याचा दावा केला आहे.
दीदी ओ दीदी…ओ आदरणीय दीदी, यंदा बंगालच्या लोकांनी तुमच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. यंदा जनता तुम्हाला धडा शिकविणार आहे. कूचबिहारमध्ये जे घडले, त्यावरील ध्वनिफित सर्वांनी ऐकलीच असेल. लोकांच्या दुःखद मृत्यूनंतर दीदी कशाप्रकारे राजकारण करत आहेत, हे या ध्वनिफितीतून स्पष्ट होत असल्याचे म्हणत मोदींनी त्यांना लक्ष्य कले आहे.
सायकलपासून रेल्वे, कागदापासून स्टील, ऍल्युमिनिअमपासून काचेपर्यंत पूर्ण भारताचे लोक अशा कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी येथे येतात. एकप्रकारे आसनसोल मिनी इंडिया आहे. भारताच्या कानाकोपऱयातील लोक येथे दिसून येत असल्याचे मोदी म्हणाले. मागील पंचायत निवडणुकांमधील मनमानी, अनुसूचित जातीच्या लोकांवरील तृणमूल नेत्याची टिप्पणी, स्पोर्ट्स क्लबांचे फंडिंग आणि विकासकामांधील भेदभाव या सर्व मुद्दय़ांची जाणीव पंतप्रधानांनी या सभेत जनतेला करून दिली आहे.
2018 ची पंचायत निवडणूक पश्चिम बंगाल कधीच विसरू शकत नाही. वर्धमानपासून बांकुरा, वीरभूम, मुर्शिदाबादच्या लोकांना त्यांचे अधिकार कसे हिरावण्यात आले हे आजही आठवते. बंगालमध्ये 20 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये थेट दीदींच्या खंडणीखोरांना बसविण्यात आले. ममतादीदींच्या दहशतीमुळे एक तृतीयांशपेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार अर्ज भरू शकले नाहीत. हल्ल्याच्या भीतीपोटी व्हॉट्सऍपवर उमेदवारी अर्ज भरावे लागले. विजयानंतर लोकप्रतिनिधींना शेजारच्या राज्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला. लोकशाहीच्या या अपमानामुळे, लोकशाहीला अशाप्रकारे कमकुवत केल्याने सर्वोच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त केल्याचे मोदी म्हणाले.
अत्याचारांवर ममतांचे मौन
ममतादीदींच्या जवळचे नेते दलितांना भिकारी म्हणतात, तरीही ममतादीदी मौन बाळगून आहेत. दीदींचे सहकारी भाजपला मतदान केल्यास लोकांना बंगालबाहेर काढण्याची धमकी देतात तरीही ममता दीदी गप्प आहेत. स्पोर्ट्स क्लब, क्रीडापटूंना मदत करण्याप्रकरणीही ममतादीदींनी भेदभाव केल आहे. ममतादीदींचे गुणगान गाणाऱयांना पैसा मिळाला, तर खेळावर लक्ष देणारे स्पोर्ट्स क्लब निधीसाठी व्याकुळ होत राहिल्याचे मोदी म्हणाले.
ममतांकडून जनतेचा विश्वासघात
10 वर्षांमध्ये ममतांनी विकासाच्या नावावर जनतेचा विश्वासघात केला आहे. विकासाच्या प्रत्येक कामासमोर ममतादीदी भिंतीप्रमाणे आडव्या आल्या. केंद्र सरकारने 5 लाख रुपयांच्या मोफत उपचाराची सुविधा दिली, तर ममता दीदींनी आडकाठी केली. केंद्र सरकारने शरणार्थींच्या मदतीसाठी कायदा केला असता ममतांनी त्याला विरोध केला. केंद्र सरकारने मुस्लीम भगिनींना तीन तलाकपासून मुक्ती देण्यासाठी कायदा आणल्यावरही ममता दीदींचा संताप झाल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
भूतपूर्व मुख्यमंत्री ठरणार
ममतादीदींच्या डोळय़ांवर अहंकाराचा पडदा चढला आहे. दीदींचे राजकारण केवळ विरोध आणि अडथळय़ांपुरती मर्यादित नसून त्यांचे राजकारण सूडाची धोकादायक मर्यादाही ओलांडून गेले आहे. मागील 10 वर्षांमध्ये भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. यंदा बंगालचे मतदार 2 मे रोजी ममतादीदींना भूतपूर्व मुख्यमंत्र्यांचे प्रमाणपत्र देतील. हे प्रमाणपत्र घेऊन फिरत रहा अशी खोचक टिप्पणी मोदींनी ममतांना उद्देशून केली आहे.