डॉ.घोडकिरेकर यांचा खुलासा : फोंडय़ातील अंत्यसंस्काराच्या वादविवादावर पडदा
प्रतिनिधी/ फोंडा
कोरोनामुळे ज्या दोघा व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यांच्यावर फोंडा सार्वजनिक स्मशानभूमित अंत्यसंस्कार झाल्याने नागरिकांनी भयभित होण्याची गरज नाही. कारण मृतदेहामुळे संसर्ग फैलावण्याचा किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला संसर्गाची बाधा होण्याचा कुठलाच धोका नसतो, असे आवाहन न्यायवैद्यकीय तज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांनी केले आहे. फोंडा पालिकेच्या विशेष बैठकीत त्यांनी हा खुलासा केल्यानंतर या वादविवादावर तुर्त पडदा पडला आहे.
राज्यात ज्या दोघां कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांच्यावर फोंडा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. फोंडा परिसरात या प्रकारावरुन वादविवाद सुरु झाल्याने त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी शनिवारी पालिका मंडळाची खास बैठक बोलावण्यात आली होती. कोरोनाबाधीत मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर दुसऱया दिवशी त्याच स्मशानभूमित फोंडय़ातील एका स्थानिक नागरिकावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यामुळे स्मशानभूमीत गेलेल्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. पालिकेला विश्वासात न घेताच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय गुप्तरित्या का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थिती करीत काही लोकांनी घडल्या प्रकाराला तिव्र आक्षेप घेतला होता. पण डॉ. घोडकिरेकर यांच्या सविस्तर खुलाशानंतर पालिका मंडळाचे समाधान झाले आहे.
आयत्यावेळी निर्णय घ्यावा लागला
चिखली वास्को येथील स्मशानभूमीत या दोन्ही मृत व्यक्तींवर अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी झाली होती. सरणही रचण्यात आले होते. मात्र आयत्यावेळी काही लोकांनी तेथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास विरोध केल्याने पुन्हा हे मृतदेह शवागारात ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे रात्रीच्यावेळी फोंडा स्मशानभूमीत दोन्ही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले, अशी माहिती डॉ. घोडकिरेकर यांनी दिली. कोविडच्या नियमावलीनुसार मृतदेहांवर पूर्ण रासायनिक प्रक्रिया करून ते निर्जतूंक करण्यात आले होते. शिवाय दोन्ही मृतदेह प्लास्टिकच्या आवरणाने पूर्णपणे झाकण्यात आले होते. मृत्यू झाल्यानंतर माणसाची श्वशनक्रिया बंद होते त्यामुळे शरीरातून संसर्ग होण्याचा धोका नसतो, असे डॉ. घोडकिरेकर यांनी स्पष्ट केले. फोंडा वासियांनी त्याबद्दल काळजी न करता दोघां कोरोनाबाधीत मृत व्यक्तींना त्यांच्या अंतिम समयी सहकार्य केल्याबद्दल अभिमान बाळगावा, असेही त्यांनी नमूद केले. मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर कुठलाच जंतू संसर्ग होण्याचा धोका नसतो, असेही त्यांनी सांगितले.
असे निर्णय घेताना पूर्वकल्पना देणे गरजेचे : रवी नाईक
बैठकीत दोन्ही मृत व्यक्तींना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही मृतव्यक्तीला अंतिम समयी त्याच्या मुलांकडून किंवा वारसदाराकडून अग्नी देण्याची प्रथा आहे. दुर्दैवाने या दोघाही मृतांवर त्यांच्या नातेवाईकाविना अंत्यसंस्कार करावे लागले, असे आमदार रवी नाईक म्हणाले. डॉ. घोडकिरेकर यांच्या खुलाशानंतर संसर्गबाधेसंबंधी गैरसमजही दूर झाला. मात्र सरकारने असा निर्णय घेण्यापूर्वी फोंडा पालिकेला विश्वासात घ्यायला हवे होते. त्यामुळेच लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन संभ्रम वाढला. या पुढे असे निर्णय घेताना सरकारने स्थानिक पालिकेला किंवा पंचायतीला विश्वासात घेणे आवश्यक आहे.
पालिकेला विश्वासात न घेतल्याने संभ्रम : नगराध्यक्ष
नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक पालिकेला कुठलीच पूर्णकल्पना न देता अंत्यसंस्कार केल्याने फोंडावासियांमध्ये संभ्रम निर्माण झाला. फोंडा पालिकेची स्मशानभूमी दक्षिण गोवा खासदार निधीतून बांधण्यात आली आहे. ही स्मशानभूमी बांधून ताब्यात घेताना कुठल्याही मृत व्यक्तीवर या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याची मुभा असेल प्रतिज्ञापत्र सरकारला दिले आहे. त्यामुळे यापुढेही सरकारने कोरोनाबाधीत रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्यास पालिका त्याला विरोध करू शकणार नाही. मात्र या पुढे एखाद्या व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्या त्या तालुक्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका मंडळाने सहकार्य करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.