दक्ष प्राध्यापकांमुळे कष्टकरी परिवाराला मिळाली दीड लाखाची मदत
कोल्हापूर / संजीव खाडे
चार पाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कर्नाटकातील विजापूरच्या कष्टकरी लमान समाजातील दामू शिवाजी पवार नावाचा विद्यार्थी भरपूर शिकायचे, आयुष्यात मोठे बनायचे, आई वडिलांचे कष्ट कमी करायचे, असे स्वप्न पाहून कोल्हापुरात आला. त्याने देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. खासगी क्लाससाठी विवेकानंद ऍकॅडमी जॉईन केली. दामू अभ्यासात हुशार होता. त्याने बारावीला 72 टक्के गुण मिळवून त्याने 2019 मध्ये एफवाय बीकॉमला प्रवेश घेतला. दामूला एक दिवस अचानक ताप आला. काही केल्या ताप कमी होईना. उपचार सुरू असताना त्याची प्रकृती खालावत गेली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचे निधन झाले. दामूचे जाणे त्यांच्यासाठी जीवन उद्धवस्त करणारे ठरले. दोन बहिणीच्या विवाहासाठी आई-वडिलांनी काढलेले कर्ज फेडण्याचे स्वप्न पाहणारा दामू या जगात नव्हता. पण याच दामूने मृत्युनंतर कर्ज फेडले. ही कहाणी कदाचित अविश्वसनीय वाटेल. पण ती खरी आहे. एका दक्ष प्राध्यापकांच्या सजगतेमुळे दामू कर्ज फेडू शकला आणि त्याला साथ मिळाली ती शिवाजी विद्यापीठाच्या एका कल्याणकारी योजनेची.
अविश्वसनीय वाटणाऱ्या या कहानीचा पुढील भाग आणि कदाचित क्लायमॅक्स असा आहे : दामूने कॉमर्स कॉलेजमध्ये अकरावीला प्रवेश घेतला तेव्हाच प्रा. अतुल निंगुरे यांची विवेकानंद ऍकॅडमीही जॉईन केली. तेथे त्याला ऍकॅडमीतील अकाउंटन्सीचे प्राध्यापक डॉ. भरत पाटील यांचे मार्गदर्शन केले. अभ्यासात हुशार आणि कष्टाळू असणाऱया दामूच्या घरची परिस्थिती माहित असल्याने डॉ. पाटील, यांनी त्याला शिकविण्याबरोबरच पार्ट टाईम जॉबही मिळवून दिला. फर्निचर मॉलमध्ये काम करत दामू शिक्षणही घेत होता. कधी कधी उपाशी, अर्धपोटी राहून शिक्षण घेणाऱया दामूचे डॉ. पाटील यांच्याशी त्याचे नाते जुळले. त्यांनी लहान भावासारखे त्याला जपले. बारावी कॉमर्सला 72 टक्के गुण मिळवून दामूने एफवायला प्रवेश घेतला. ही गोष्ट 2019 मधील.
पुढे शिक्षण घेत असताना दामूचे नोव्हेंबरमध्ये अकाली, अकस्मिक निधन झाले. या दुर्दैवी घटनेनंतर डॉ. पाटील, प्रा. निंगुरे आदींनी दामूच्या विजापूरमधील झोपडीतील घरी जाऊन त्याच्या आई वडिलांची भेट घेऊन सात्वंन केले. दामूच्या दोन बहिणीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज त्याच्या कष्टकरी वडिलांच्या डोक्यावर असल्याचेही समजले. विजापूरहून परतल्यानंतर डॉ. पाटील यांच्या डोळÎासमोरून दामूची प्रतीमा जात नव्हती. दामूने एफवायच्या प्रवेशावेळी शैक्षणिक शुल्क भरताना विद्यार्थी कल्याण निधीसाठी पन्नास रूपये भरल्याची डॉ. पाटील यांना माहिती होती. शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी कल्याण निधी असा आहे की, त्यातून जर एखाद्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याच्या आई-वडिलांना दीड लाख रुपये आणि जर विद्यार्थ्याच्या आई किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये दिले जातात. डॉ. पाटील यांना या निधीतून मिळणाऱ्या रकमेची माहिती होती. त्यांनी थेट विजापूर येथे जाऊन दामूच्या आई वडिलांकडून आवश्यक ती सर्व कागदपत्रे मिळवली. त्यानंतर कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, क्लार्क वीरेश सर, संग्राम सर, तसेच विद्यापीठातील आर. व्ही. गुरव यांच्या सहकार्याने सर्व कागदपत्रे सादर केली. दामूच्या वडिलांचे बँकेत खाते स्वतः पैसे देवून उघडले. त्यांना विजापूरहून कोल्हापुरात आणल्यानंतर त्यांची भोजन, निवास व्यवस्थाही केली. विद्यापीठाने दामूचे वडील शिवाजी पवार यांच्या खात्यामध्ये दीड लाख रुपये जमा केले. त्यांनी या रकमेतून कर्जाचा बोजा कमी करत दामूच्या नावाने छोटीशी खोली बांधण्याचे ठरविले आहे. पवारांचा दामू शिक्षण आणि जीवन अर्धवट सोडून गेला. पण जाताना आपल्या आई-वडिलांचे ऋण फेडून गेला. दामूची आठवण सांगताना डॉ. भरत पाटील, प्रा. अतुल निंगुरे यांना गहिवरून आले. एका प्राध्यापकाच्या दक्षतेमुळे दामूच्या परिवाराचे कल्याण झाले.