भारतात कोरोनामुळे 42 लाख बळी गेल्याचे ‘इकॉनॉमिस्ट’चे मत- विदेशी मीडियातील वृत्त केंद्र सरकारने फेटाळले
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनामुळे 42 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज न्यूयॉर्क टाईम्सने व्यक्त केला होता. त्यानंतर आता ‘इकॉनॉमिस्ट’ या मासिकानेही देशात सरकारने सांगितलेल्या आकडेवारीपेक्षा सातपट मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पण केंद्र सरकारने ‘इकॉनॉमिस्ट’चा हा दावा फेटाळला असून कोरोना मृतांचा आकडा लपवला नसल्याचे म्हटले आहे. सद्यस्थितीतील आकडेवारीनुसार भारतात आतापर्यंत 3.67 लाख इतक्या जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.
‘इकॉनॉमिस्ट’ने देशाच्या सहा राज्यांतील कोरोना आकडेवारीचा अभ्यास केला आहे. त्यानुसार 2021 या वर्षातील पहिल्या 19 आठवडय़ांत प्रति एक लाख रुग्णांमागे 131 ते 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानुसार संपूर्ण देशाची आकडेवारी पाहता 17 ते 24 लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी ‘इकॉनॉमिस्ट’ने जारी केली आहे. केंद्र सरकराने ‘इकॉनॉमिस्ट’ची मृत्यूसंबंधीची आकडेवारी पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.
आकडेवारी काल्पनिक ः भारताची स्पष्टोक्ती
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ‘इकॉनॉमिस्ट’चे नाव न घेता त्यातील माहिती खोटी असल्याचे सांगितले. तसेच हा लेख काल्पनिक आणि भ्रम पसरवणारा असून त्या आकडेवारीला काहीच आधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अहवालात कोरोना संसर्गाच्या माहितीचे ज्या पद्धतीने मूल्यांकन केले गेले आहे, त्याला कोणताही आधार नाही. इतर कोणत्याही देशात डेटाचा या प्रकारे अभ्यास केला जात नाही, असेही ते पुढे म्हणाले.
भारताची स्पष्टोक्ती…
ज्या पद्धतीने संशोधन केले गेले त्याची माहिती अहवालात नमूद केलेली नाही. अशा प्रकारच्या इंटरनेट संशोधनासाठी रिसर्च गेट आणि पबमेडची मदत घेतली जाते. निवडणुकांच्या निकालांवर सर्वेक्षण करणारे सी-व्होटर आणि प्रश्नम यासारख्या एजन्सींकडील माहितीचा आधार घेतला असला तरी या एजन्सींना सार्वजनिक आरोग्याशी संबंधित संशोधनाचा अनुभव नाही. कधीकधी त्यांचे दावे निकालांपेक्षा भिन्न असल्याने त्यांची माहिती अचूक ठरत असल्याचे दिसत नाही. तसेच सदर आकडेवारीमध्ये काही भागातील नोंदी विचारात घेऊन दावे करण्यात आल्याने त्यात तथ्य असल्याचे दिसत नाही, अशी स्पष्टोक्ती भारताने दिली आहे.
आयसीएमआर, डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन
भारत सरकार कोरोनाच्या आकडेवारीसंदर्भात संपूर्ण पारदर्शकता स्वीकारत आहे. कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंमध्ये होणारा गोंधळ टाळण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मे 2020 मध्ये जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या ‘आयसीडी-10’ कोडनुसार मृत्यूच्या नोंदी ठेवल्या जात असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
‘डेटा अभ्यास केंद्रा’ची आकडेवारीवर नजर
केंद्र सरकारने यापूर्वीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनाचा अचूक डेटा जाहीर करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारची टीमही यावर काम करत आहे. राज्यांमधून येणाऱया आकडेवारीचा अभ्यास दररोज जिल्हानिहाय केला जातो. ज्या राज्यांमधून मृतांची संख्या सातत्याने खाली येत आहे, त्यांना जिल्हानिहाय याची पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आले. केंद्र सरकारनेही बिहार सरकारला सर्व जिल्हय़ांमधील मृत्यूंचा अहवाल देण्यास सांगितले आहे, अशी स्पष्टोक्तीही केंद्र सरकारद्वारे देऊन विदेशी वृत्तपत्रांमधील खोटे दावे फेटाळून लावण्यात आले आहेत.
19 आठवडय़ांतील डेटाच्या आधारे दिले वृत्त
भारतात कोरोनामुळे होणाऱया मृत्यूंची संख्या प्रत्यक्षातील मृत्यूंच्या तुलनेत 5 ते 7 पट जास्त आहे, असा दावा ब्रिटनमधील मॅगझिन ‘द इकॉनॉमिस्ट’ने केला होता. या मासिकाने शनिवारी एक लेख प्रकाशित केला. सदर लेख व्हर्जिनियातील कॉमनवेल्थ विद्यापीठाच्या ख्रिस्तोफर लेफलर यांच्या संशोधनावर आधारित होता.