प्रतिनिधी /पणजी :
राज्यात कोरोनाबळींची संख्या वाढत चालली आहे. कोरोना बळींची संख्या 342 वर पोहोचली आहे, पण सरकार या सततच्या बळींबाबत गंभीर दिसत नाही. काल सर्वात कमी वयाच्या 12 वर्षांच्या मुलाला कोरोनामुळे मृत्यू आला, तर 25 वर्षाच्या अन्य एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 24 तासात सात जणांचे बळी गेले. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून आतातरी सरकारने जागे व्हावे, अशी सूचना केली आहे.
मागील आठ दिवसांत तब्बल 67 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील तीन दिवसात रोज 8 बळी गेले आहेत. काल वयाच्या 12 वर्षे वयाच्या मुलाला कोरोनामुळे मृत्यू आला. तर 25 आणि 28 वर्षे वयाचे रुग्णही कोरोनाचे बळी ठरत आहे. कोरोना मृत्यूचा खेळ हा आता सततचा झाला आहे. सरकारी पातळीवरून याबाबत गांभीर्याने दखल घेतली जाते का हा प्रश्न आता चर्चेचा बनला आहे. विरोधी पक्षासह अन्य पक्षांचे नेतेही सरकारवर गंभीर आरोप करीत आहे.
एका बाजूने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. कोरोनाचा फैलाव वाढत आहे, तर दुसऱया बाजूने बळींची संख्या वाढत चालली आहे. गोव्याच्या सर्वच भागात कोरोनाच फैलाव वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोना पसरत आहे ही गंभीर बाब आहे. कोरोनाबाबत लोकांध्ये जागृती होण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता सरकारी पातळीवरून जागृतीची अत्यंत गरज आहे.
बाहेरुन येणारे पर्यटकही कोरोनाचे वाहक
गोव्याबाहेरुन येणारे पर्यटकही कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. काल पणजीत मुंबईवरून आलेले तब्बल सात जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. हे सर्व लोक पणजीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. या पर्यटकांच्या संपर्कात आलेले हे हॉटेलचे कर्मचारी असतील. त्यामुळे गोव्यातील लोकांसाठी पर्यटक घातक ठरण्याची शक्यता आहे.
मृत्यूबाबत सरकार आणखी गंभीर व्हायला हवे
कोरोनामुळे बळींची संख्या वाढत चालली आहे. 14 सप्टेंबरला तब्बल 14 रुग्णांना मृत्यू आला. त्या दिवशी सरकारची धावाधाव सुरू झाली. दुसऱया दिवशी पुन्हा 11 बळी गेले. आता मागील तीन दिवस सलगपणे प्रतिदिन कोरोनामुळे 8 बळी गेले, पण सरकारी पातळीवरून गांभीर्याने दखल घेतली जात नाही, असा आरोप होत आहे.
सर्व बाजूला सारून कोरोनावर फोकस करा : दिगंबर कामत
प्राधान्यक्रमाच्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून सरकारने पूर्णपणे कोरोनावर लक्ष द्यायला हवे, अशी सूचना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. काल मृत्यू पावलेल्या अवघ्या 12 वर्षे वयाच्या मुलाच्या मृत्यूमुळे ते प्रचंड अस्वस्थ झाले. नागरिकांचे प्राण वाचविणे ही सरकारची प्राथमिकता असायला हवी. जे लोक शाळा सुरू करण्याचा हट्ट धरतात त्यांनी 12 वर्षाच्या मुलाच्या मृत्यूमुळे बोध घ्यायला हवा. मुलांच्या आयुष्याशी खेळाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असे आवाहनही कामत यांनी केले आहे. सरकारने आता तरी जागे व्हावे आणि आरोग्याच्या काळजीला प्राधान्यक्रम द्यावा. यावेळी त्यांनी त्या मुलाच्या मृत्यूबद्दल आणि कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या सर्वांच्याच निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.