बेअंत सिंग हत्या प्रकरण
नवी दिल्ली
पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग हत्याप्रकरणातील गुन्हेगार बलवंत सिंग राजोआनाच्या दया याचिकेवर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला अंतिम संधी देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राजोआनाच्या याचिकेवर पुढील दोन आठवडय़ांत एखादा निर्णय घ्यावा असा निर्देश केंद्र सरकारला दिला आहे. तर केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यासाठी 3 आठवडय़ांची मुदत मागण्यात आली होती. पण एवढा कालावधी अतार्किक वाटतो, 26 जानेवारीपर्यंत अर्ज निकाली काढण्यास सांगण्यात आले होते, परंतु असे घडले नाही. राजोआना 25 वर्षांपासून तुरुंगात असून मागील 9 वर्षांपासून त्याची दयायाचिका प्रलंबित आहे. तारखेवर तारखा देण्यात येत आहेत, आता यावर निर्णय व्हावा असे न्यायालयाने म्हटले आहे. राजोआना हा पंजाब पोलीस दलाचा माजी कॉन्स्टेबल आहे. 1995 मध्ये पंजाब सचिवालयासमारे झालेल्या स्फोटात सामील असल्याप्रकरणी त्या दोषी ठरविण्यात आले आहे. या हल्ल्यात माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग समवेत 17 जणांचा मृत्यू झाला होता. राजोआनाला उच्च न्यायालयाने मृत्युदंड ठोठावला होता. या शिक्षेला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. परंतु सुमारे 9 वर्षांपूर्वी त्याने राष्ट्रपतींकडे दयायाचिका केली होती.