डॉ. अपर्णा गावकर यांची माहिती : वाढत्या मृत्यूंची कारणमिमांसा सुरू : जिल्हा प्रशासनाचे सहकार्य
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या वाढत असलेल्या मृत्यूंमागील कारणाचा सखोल अभ्यास करून मृत्यूचा हा वाढता आकडा कमी करण्यासाठी जिल्हा रुग् णालयातील मृत्यूंचे ‘डेथ ऑडिट’ सुरू करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमती अपर्णा गावकर यांनी तरुण भारतला दिलेल्या एका विशेष मुलाखतीदरम्यान दिली. सद्यस्थितीत मागील चार दिवसांत मृत्यूचे प्रमाण काहीसे घटले असले, तरी त्यात अजूनही घट व्हावी, या दृष्टीने तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने अधिकच्या उपाययोजना करण्यास सुरुवात झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्गातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा राज्यात प्रथम क्रमांकावर होता. याबाबत बोलताना डॉ. गावकर म्हणाल्या, सिंधुदुर्गाच्या लौकिकाच्या दृष्टीने ही बाब अतिशय लाजीरवाणी होती. मृत्यूचे प्रमाण हे एवढे वाढले का? तेच सुरुवातीला समजत नव्हते. त्यामुळे संपूर्ण यंत्रणाच गोंधळून गेली होती. शेवटी या मागची कारणे शोधून काढण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सूचनेनुसार कोरोनाने मृत्यू होणाऱया रुग्णांचे ‘डेथ ऑडिट’ सुरू केले. या ऑडिटमधून असं लक्षात आलं की, बहु आजार असलेल्या रुग्णांना हा नवा व्हायरस लवकर डॅमेज करतो. त्यात बहुतांशी रुग्ण आजार अंगावर पेलून तब्येत गंभीर बनली की रुग्णालयात धाव घेत व नंतर त्यांना वाचवणे कठीण जायचे. डेथ ऑडिटमधून हे लक्षात आल्यानंतर वृत्तपत्र माध्यमातून सर्वत्र याबाबत जनजागृती करण्यात आली. लक्षणे दिसताच रुग्णांना तातडीने आर. टी. पी. सी. आर. तपासणी करून त्याची टेस्ट पॉझिटिव्ह आली, तर त्या रुग्णास तातडीने कोविड रुग्णालयात दाखल करण्याबाबतच्या सूचना करण्यात आल्याचे व त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने मृत्यूदरात घट होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाचे चांगले सहकार्य
डेथ रेट काहीसा खाली येण्यामागच्या कारणांची मिमांसा करताना डॉ. अपर्णा गावकर म्हणाल्या, यासाठी आपणास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रामुख्याने आभार मानावे लागतील. या लोकांनी आरोग्य यंत्रणेला प्रचंड सहकार्य केलं. आमच्या खांद्याला खांदा लाऊन काम केलं. आम्हाला मानसिक, आर्थिक, बौद्धिक आणि शारीरिक बळही दिलं. हे अधिकारी अगदी खंबीरपणे आमच्या पाठिशी राहिले. या प्रतिकुल परिस्थितीत आम्हाला ऑक्सिजन कमी पडू दिलेला नाही. कोल्हापूर आणि रत्नागिरी येथून खास कोटय़ातील ऑक्सिजन पुरवून दिला. तसेच पालकमंत्री, आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींनी रुग्णांसाठी लागणाऱया अत्यावश्यक सुविधा कमी पडू दिल्या नाहीत. डॉक्टर उपलब्ध करून दिले आणि या सर्वांचे सकारात्मक असे दृश्य परिणाम आपणास दिसू लागले, असे त्या म्हणाल्या. आता व्हेन्टीलेटरवरील रुग्ण देखील बरे होऊन घरी जाऊ लागलेत. आपणास जर आता पूर्णवेळ फिजिशियन दर्जाचे डॉक्टर उपलब्ध झाले, तर हा दररोजच्या मृतांचा आकडा खाली येण्यास अजिबात वेळ लागणार नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांची संख्या वाढत असली, तरी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्हेंन्टीलेटर्सचा गोंधळ नाही
जिल्हय़ात उपलब्ध व्हेन्टीलेटर्सच्या गोंधळाबाबत बोलताना डॉ. गावकर म्हणाल्या, व्हेन्टीलेटरबाबत गोंधळ वैगरे काही नाही. जिल्हय़ात जर 40 व्हेन्टीलेटर उपलब्ध असतील, तर त्यातील दहा हे एन. आय. व्ही. च्या गाईडलाईननुसार स्टँडबाय ठेवावे लागतात. हे स्टँडबाय यासाठीच की एखाद्या वेळीस व्हेन्टीलेटरवर पेशंट असताना तो व्हेन्टीलेटर अचानक बिघडू शकतो. त्यावेळी त्याला काही क्षणातच दुसरा व्हेन्टीलेटर लावावा लागतो. अन्यथा त्याचा जीव धोक्यात येण्याची दाट शक्यता असते. दुसरं म्हणजे आपल्याकडे रुग्णालयात ऑक्सिजन थेरेपी घेणारा रुग्ण कधीकधी अत्यवस्थही होऊ शकतो. अशा रुग्णांसाठी व्हेन्टीलेटर राखून ठेवावे लागतात. त्यामुळे स्टँडबाय व्हेन्टीलेटरचा उल्लेख शिल्लक व्हॅन्टीलेटर म्हणून होतो आणि यातून कदाचित गैरसमज निर्माण होत असेल, असे त्या म्हणाल्या.
त्रुटी काढत बसण्यापेक्षा मोटीव्हेशनची गरज
जिल्हा कोविड आय. सी. यू. मध्ये एस. सी. बंद असल्याच्या आरोपांचा खुलासा करताना डॉ. गावकर म्हणाल्या, कुठल्याही कोविड आय. सी. यू. मध्ये सेंट्रल ए. सी. लावण्यास परवानगी नसते. त्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. रुग्णासाठी स्पेशल रुम असेल, तर त्या ठिकाणी त्या रुम पुरता लावता येतो. पण सरसकट संपूर्ण कोविड आय. सी. यू. ला लावता येत नाही. त्यामुळे जिथे एसी लावलेलाच नाही, तिथे बंद असण्याच्या आरोपाला अर्थच उरत नसल्याचे त्या म्हणाल्या.
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घरून पंखे आणावे लागतात, त्या बाबतच्या आरोपांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, या कोविड आय. सी. यू. मध्ये एकाचवेळी अनेक यंत्रणे सुरू असतात. त्यामुळे साहाजिकच या यंत्रातून हिट जनरेट होते. सर्व पंखे सुरू असूनही रुग्णांना फारसा थंडावा मिळत नाही. त्यात काही रुग्णांना जोराच्या पंख्याची सवय असते, तर काहींना वाऱयाचा त्रास होतो. त्यामुळे ज्यांना जादा वाऱयाची आवश्यकता असते, ते आम्हाला विनंती करून घरून पंखे घेऊन येतात. आम्ही माणुसकी या नात्याने त्यांना परवानगी देतो. यात चुकीचं काय आहे? घरात बसून वैद्यकीय सेवेतील त्रुटी काढत बसण्यापेक्षा आमच्या यंत्रणेला मोटीवेशन दिलं, तर ही यंत्रणा अधिक सक्षमपणे काम करेल, असे डॉ. गावकर यांनी स्पष्ट केले.