हेलिकॉप्टर अपघातातील ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचाही मृत्यू
शोककळा…
- बेंगळूरमधील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
- अपघातानंतर 8 दिवसांनी जीवनाची लढाई
बेंगळूर, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हेलिकॉप्टर अपघातात जखमी झालेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचे बुधवारी निधन झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने ट्विट करून दिली. ग्रुप कॅप्टन वरुण यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून गंभीर दुखापतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे हवाई दलाने सांगितले. त्यांच्यासोबत असलेल्या इतर 13 जणांचा मृत्यू झाला होता. वरुण सिंह यांच्यावर बेंगळूरमधील रुग्णालयात उपचार सुरु होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना मागील वर्षीच शौर्यचक्राने सन्मानित करण्यात आले होते.
तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये मागील आठवडय़ात भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात देशाचे पहिले सीडीएस बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता. यात फक्त ग्रुप कॅप्टन वरुण सिंह बचावले होते. या अपघातात त्यांचे शरीर गंभीररित्या जळाले होते. सुरुवातीला त्यांना वेलिंग्टन येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारार्थ मागील गुरुवारी सायंकाळी एअर ऍम्ब्युलन्सने बेंगळूर येथील इस्पितळात हलवण्यात आले. लाईफ सपोर्टवर ठेवून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते.
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या निधनामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 14 झाला आहे. दुर्घटनेनंतर आठ दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते. वरुण सिंह यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. वरुण यांनी चंडी मंदिर स्कूल, चंदिगढमधून बारावी पूर्ण केली. 2004 मध्ये त्यांची एनडीएमध्ये निवड झाली. वरुणचे कुटुंब 20 वर्षांपूर्वी भोपाळला शिफ्ट झाले होते. त्यानंतर त्यांनी तेथे घरही बांधले होते. वरुण हे यांचे वडील के. पी. सिंह आणि आई उमा हे भोपाळमध्ये राहत होते. तर वरुण सिंह हे पत्नी आणि दोन मुलांसह वेलिंग्टनमध्ये राहत होते. सीडीएस बिपिन रावत यांना स्वीकारण्यासाठी त्यांना प्रोटोकॉल ऑफिसर नेमण्यात आले होते. गेल्या वषी तेजस लढाऊ विमान उडवताना त्यांना मोठय़ा तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले होते, मात्र त्यांनी हिंमत न गमावता विमान सुरक्षितपणे उतरवल्यामुळे त्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आले होते.