वाघ, वाघीणीसह व दोन बछडय़ांचा समावेश
उदय सावंत/वाळपई
गेल्या दोन दिवसांपासून गाजणाऱया गोळवली-सत्तरी येथील वाघाच्या मृत्यू प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. मंगळवारी रात्री वाघाच्या बछडय़ाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर काल बुधवारी दिवसभरात आणखी दोन वाघांच्या मृत्यूचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे आतापर्यंत मृतावस्थेत सापडलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. त्यात वाघ, वाघीण व बछडय़ांचा समावेश आहे. याप्रकरणी गोळावली धनगरवाडय़ावरील तिघांना अटक करण्यात आली आहे.
या घटनेनंतर आता म्हादई अभयारण्याच्या क्षेत्रात शिल्लक राहिलेल्या तीन वाघांचे संवर्धन व रक्षण करण्याचे आव्हान वनखात्यासमोर उभे राहिले आहे. या चारही वाघांवर विषबाधेचा प्रयोग झाल्याच्या संशयावरून वनखात्याने गोळवली धनगरवाडा येथील तिघांना अटक करुन चौकशीसाठी दोन दिवसांचा रिमांड घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकारातील सत्य काय हे लवकरच उजेडात येणार आहे. या प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे.
मंगळवारी सापडलेल्या बछडय़ाची शवचिकित्सा
गोळवली गावापासून जवळपास दोन किलोमीटर अंतरावरील सिद्धेश्वराची गुंफा या ठिकाणी रविवारी देवस्थानचा पारंपरिक भुगत उत्सव साजरा करण्यासाठी गेलेल्या नागरिकांना तेथे एका वाघाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले होते. त्याबाबत लगेच वनखाते व अभयारण्याच्या अधिकाऱयांना माहिती देण्यात आल्यानंतर पुढची प्रक्रिया करण्यात आली. त्या दिवसापासून कोंबिंग ऑपरेशन सुरु होते. हे ऑपरेशन सुरु असतानाच बुधवारी एका बछडय़ाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. या बछडय़ाला जमिनीमध्ये पुरण्यात आले होते. या बछडय़ाची उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यात आली. त्याच्या अवयवांचे नमुने गोळा करण्यात आले असून तपासणीसाठी डेहराडून याठिकाणी पाठविण्यात येणार असल्याचे पशु वैद्यकीय अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
बुधवारी सापडले वाघीण व बछडय़ाचा मृतदेह
काल बुधवारी पुन्हा कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. त्यावेळी मंगळवारी जिथे बछडा सापडला होता त्या ठिकाणापासून शंभर मीटर अंतरावर वाघिणीचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पुढे आणखी काही अंतरावर आणखी एका बछडय़ाला जमिनीमध्ये गाढल्याचा प्रकार उघडकीस आला. यामुळे मोठय़ा प्रमाणात खळबळ निर्माण झाली. आता एकूण मृत अवस्थेत सापडलेल्या वाघांची संख्या चार झाली आहे. यात वाघ, वाघीण व दोन बछडय़ांचा समावेश आहे. वन खात्याच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार वाघीण जवळपास आठ वर्षाची तर बछडे जवळपास अडीज वर्षाचे आहेत.
धनगरवाडय़ातील तिघा संशयितांना अटक
या प्रकरणाबाबत काही नागरिकांच्या हालचाली संशयित दिसल्याने म्हादई अभयारण्याच्या अधिकाऱयांनी मंगळवारी उशिरा चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार विषप्रयोग झाल्याचा संशय असल्यामुळे त्यांना वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे विठो झिपो पावणे (60 वर्षे), नालो नागो पावणे (55 वर्षे), बोमो नागो पावणे (45 वर्षे) यांचा समावेश आहे. हे तिघेही संशयित गोळवली धनगरवाडा येथे राहणारे आहेत. वाघांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले त्या ठिकाणापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर त्यांची घरे आहेत. त्यांना काल बुधवारी संध्याकाळी वाळपई प्रथम न्यायदंडाधिकाऱयासमोर हजर केले असता चौकशीसाठी दोन दिवसांचा रिमांड देण्यात आलेला आहे.
रविवारी सापडलेल्या एकाच वाघाची नखे गायब
रविवारी मृतावस्थेत सापडलेल्या वाघाची नखे गायब झाल्याचे आढळून आले होते. यामुळे वाघाच्या नखांची मोठय़ा प्रमाणात तस्करी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर सापडलेली वाघीण व दोन बछडय़ांची नखे मात्र गायब नसल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. यामुळे सिद्धेश्वराची गुंफा या ठिकाणी रविवारी सापडलेल्या वाघाची नखे कोणी गायब केली यासंदर्भाचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यासंदर्भात वनखात्याची यंत्रणा तपास करीत आहे.
कोंबिंग ऑपरेशनमुळे प्रकरण उघडकीस
वन अधिकाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभयारण्याच्या परिक्षेत्रात वेगवेगळय़ा ठिकाणी जनावरांच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेरा लावण्यात आलेले आहेत. यापुर्वी एक वाघीण व तीन बछडे जंगलामध्ये फिरताना कॅमेरामध्ये बंदिस्त झाले होते. कोंब्ंिाग ऑपरेशनमुळे आता या सर्वांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.
झाल्या प्रकाराला अखेर जबाबदार कोण
या सर्व प्रकाराला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी सदर भागातील धनगर बांधवांच्या दोन गुरांची वाघाकडून शिकार करण्यात आली होती. या संदर्भाच्या तक्रारी सदर कुटुंबियाकडून म्हादई अभयारण्याच्या अधिकाऱयाकडे करण्यात आल्या होत्या. मात्र या संदर्भात कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेवटी कंटाळून सदर कुटुंबाने विषाचा प्रयोग केला असावा असा संशय व्यक्त होताना दिसत आहे.
दरम्यान चौथ्या वाघाचा मृत्यू बुधवारी संध्याकाळी उघडकीस आला. त्यामुळे त्याच्यावर उत्तरीय तपासणी करता आली नाही. ही प्रक्रिया गुरुवारी सकाळी करण्यात येणार आहे. वाघीण व एका बछडय़ावर उत्तरीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे.