अन्य आजारांमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट : घाबरून न जाण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आवाहन
- खलाशांना होत असलेल्या आजाराचे सर्वेक्षण
- सिंधुदुर्ग, रत्नागिरी दोन्ही जिल्हे कोरोना मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये व होम क्वारंटाईनमध्ये मृत्यू झालेल्या सातही रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अन्य आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देवगड व मालवण तालुक्यातील खलाशांना हात, पाय सुजणे आणि ताप येणे, असे आजार होत आहेत. त्याचे नेमके निदान झालेले नाही. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व इतर विविध आजारांबाबत जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ते म्हणाले, 15 ते 24 एप्रिल या कालावधीत जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये सहाजणांचा व होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या एका रुग्णाचा अशा सातजणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना फैलाव सर्वत्र सुरू असताना आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांचा मृत्यू झाल्याने नेमका मृत्यू कशामुळे झाला, याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था होती. मात्र मृत्यू झालेल्या त्या सातही रुग्णांचे कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अन्य आजारांमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, हे आता स्पष्ट झाले आहे.
शाम पाटणे (55), वसंत कुंभार (75), हनुमंत मदार (80), निलेश माचीवले (35), पंजली सावंत (21), महादेव तारी (82) आणि नलिनी पांगे (75) या सातजणांचा मृत्यू झाला आहे. यामधील चारजणांचा टीबीच्या आजाराने, एकाचा अल्कोलिंकमुळे, एकाचा किडनीच्या आजाराने, तर एकाचा डायबेटीजमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे अन्य आजारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. सद्यस्थितीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तापाचे रुग्ण सुद्धा आणले जातात. त्यामुळे लोकांनी कोरोनाच्या भीतीने घाबरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
माकडतापाच्या निदानासाठी लवकरच प्रयोगशाळा
दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत माकडतापाचे 34 रुग्ण सापडले असून चौघांचा मृत्यू झाला आहे. तीसजण बरे झाले आहेत. माकडतापाच्या निदानासाठी 2016 मध्ये प्रयोगशाळा मंजूर झाली होती. त्यासाठी 50 लाखाचा प्रस्तावही गेला होता. परंतु, तांत्रिक अडचणीमुळे तो मंजूर झाला नाही. आता परिपूर्ण प्रस्तावच पाठवला जाणार आहे. याबाबत आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशीही चर्चा झाली आहे. लॉकडाऊन उठल्यानंतर प्रयोगशाळेचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. तोपर्यंत माकडतापाच्या रुग्णांचे नमुने पुणे येथे पाठविले जात आहेत. तसेच मणिपाल संस्थेशीही जिल्हाधिकाऱयांमार्फत चर्चा सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.
प्रशासन, लोकांच्या सहकार्यामुळे कोरोनामुक्त
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. दोन्ही जिल्हय़ांच्या जिल्हाधिकाऱयांनी भरपूर मेहनत घेतली व लोकांनी सहकार्य केल्यामुळे दोन्ही जिल्हे कोरोनामुक्त होण्यात यश मिळाले आहे. हे यश कायम टिकवून ठेवण्यासाठी जिल्हय़ाच्या सीमांवर कायम कडकोट बंदोबस्त ठेवून सीमा बंद राहणार आहेत आणि संचारबंदीचे उलंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, असेही पालकमंत्री म्हणाले.
रेल्वे टॅकने येणाऱयांना घेणार ताब्यात
सर्वत्र संचारबंदी असतानाही जिल्हय़ाबाहेरील लोक रेल्वे ट्रकने येत आहेत. त्यांना ताब्यात घेण्याबाबत रेल्वे अधिकारी व पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. रिक्षा व्यावसायिकांचे पीयूसी, परमिट लायसन नूतणीकरण करण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कृषी औजारे, अत्यावश्यक सेवा सुरूच आहेत. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, त्या ठिकाणी, कामगारांना त्रास न होता पासेस देण्याच्या सूचना दिल्या आहेत. काजू बी दराबाबत जिल्हा बँक यशस्वीपणे काम करीत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
देवगडातील खलाशांच्या आजाराचे सर्व्हेक्षण
मालवण व देवगड तालुक्यात खलाशांचे पाय सुजणे, ताप येणे असा आजार सुरू आहे. याचे नेमके कारण समजलेले नाही. त्यामुळे मालवण व देवगड येथे या आजाराबाबत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. देवगड व मालवणमधील खलाशांनी शक्यतो सरकारी रुग्णालयामध्ये दाखल व्हावे. म्हणजे योग्य ते उपचार करता येणार आहेत. तसेच खलाशांच्या आजाराबाबत लवकरात लवकर निदान करून त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.