वृत्तसंस्था/ बिजींग
15 जूनच्या मध्यरात्रीनंतर लडाखमध्ये भारत आणि चीनी सेनेत झालेल्या झटापटीत चीनचे अनेक सैनिक ठार झाल्याची घटना घडली आहे. मात्र या सैनिकांची नावे अद्याप चीनने उघड केली नाहीत. त्यामुळे या मृत सैनिकांचे नातेवाईक प्रक्षुब्ध झाले आहेत. त्यांची समजून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चीनी सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने यासंबंधी माहिती दिली आहे. मृत सैनिकांच्या पार्थिवांचा यथोचित सन्मान चीनी सेनेकडून करण्यात आला आहे. योग्य वेळी त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली जाईल. त्यांनी चिंता करू नये. त्यांची नावेही घोषित केली जातील. त्यानंतर त्यांचे नातेवाईक व मित्रमंडळी त्यांचा विरश्रीचे कौतुक करू शकतील, असे या वृत्तपत्राने म्हटले आहे. त्यांची नावे घोषित करण्यास इतका वेळ का लावला जात आहे, याचे उत्तर मात्र या वृत्तपत्राने दिलेले नाही. चीनचे किमान 40 सैनिक ठार झाले असे वृत्त भारतीय माध्यमांनी दिले आहे.
ते अतिरंजित असल्याचा दावाही या वृत्तपत्राने केला आहे. परंतु अमेरिकेच्या गुप्तचरांनीही चीनचे किमान 35 सैनिक ठार झाल्याचे म्हटले आहे. त्यावर या वृत्तपत्राने कोणतीही टिप्पणी केलेली नाही.