प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटकातील अनेक ठिकाणी आजही ‘मॅन्युअल स्कॅव्हेंजींग’ची (मानवी मैला वाहून नेणे) पद्धत अस्तित्त्वात आहे. यासंबंधीची माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगासमोर आली आहे. ही पद्धत आजही जिवंत असेल तर संबंधित संस्था व अधिकाऱयांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे या अनिष्ट प्रथेवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे, असे आवाहन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी केले आहे.
गुरुवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी वरील आवाहन केले आहे. सफाई कर्मचाऱयांना दिल्या जाणाऱया सोयी-सुविधांचा बैठकीत आढावा घेण्यात आला. मानवी मैला हाताने स्वच्छ करणे व ते वाहून नेण्यास
मॅन्युअल स्कॅव्हेंजींग म्हणतात. ही पद्धतच अनिष्ट आहे. त्याला थारा देवू नये, असे डॉ. पी. पी. वावा यांनी सांगितले.
2013 पासून या अनिष्ट पद्धतीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी मैलावाहू काम करणाऱयांचे सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन केले जात आहे. या अनिष्ट पद्धतीवर बंदी असल्यामुळे जिल्हय़ात सीएसआर अनुदानातून रोबोटिक यंत्रे खरेदी करण्यासंदर्भात विचार करावा, असा सल्ला देतानाच सफाई कर्मचारी व त्यांच्यावर विसंबून असणाऱयांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी अर्ज करण्यापासून मदत मिळवून देण्यापर्यंत शासकीय अधिकारी व वेगवेगळय़ा संस्थांनी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले, कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास अनुकंपाच्या आधारावर कायमस्वरुपाची नोकरी देण्याची तरतूद नाही. मात्र मृतांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कंत्राटी पद्धतीने काम देता येणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही., पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा नगरविकास योजना कोषचे ईश्वर उळागड्डी, समाज कल्याण खात्याच्या डॉ. उमा सालीगौडर आदी उपस्थित होते.
42 जणांना मदत
जिल्हय़ातील ग्रामीण भागात मॅन्युअल स्कॅव्हेंजींगचे काम करणाऱया 42 जणांना प्रत्येकी 40 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिली. शहरी भागातही ही प्रथा सुरू असल्याची माहिती होती. यासंबंधी सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्याची पडताळणी सुरू असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.