भाजपची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर, 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन
प्रतिनिधी/कोल्हापूर
सरकारच्या आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेत मेंदूवरील शस्त्रक्रीया व उपचारांचा समावेश करावा, अशी मागणी मंगळवारी भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. येत्या 15 दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, सर्व सामान्य नागरिकांसाठी आरोग्याची काळजी घेत केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान व महात्मा फुले यासारख्या अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. अशा योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक गरजू कुटुंबांना झाला आहे. कोल्हापूर शहरात 18 हॉस्पिटल मध्ये शासनाच्या योजनेच्या माध्यमातून रुग्णावर उपचार करण्यात येतात. परंतु या 18 हॉस्पिटल पैकी एकाही हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या शस्त्रा†क्रया व उपचार होत नाहीत. या ठिकाणी योजनेमध्ये मेंदूवरील उपचारांचा समावेश करुन त्यानुसार कार्यवाही व्हावी. येत्या 15 दिवसात याबाबत निर्णय न झाल्यास आंदोलन छेडले जाईल.
राहूल चिकोडे म्हणाले, अनेक वेळेला अपघातामध्ये डोक्याला मार लागून रुग्णांना त्वरित उपचार व शस्त्रक्रिया कराव्या लागतात. परंतु पण कोल्हापूर सारख्या मेडिकल हब असणा-या शहरामध्ये अशा रुग्णांनी जायचे तरी कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. खाजगी रुग्णालयांमधील खर्च त्यांना परवडणारा नाही. मग आयुष्यमान व महात्मा फुले योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासण्यासारखे होईल. त्याचबरोबर मेंदूवर उपचार करण्यासाठी संबंधित रुग्णालयांना लेखी आदेश देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
शिष्टमंडळात नगरसेवक जित ठाणेकर, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, विजय जाधव आदी उपस्थित होते.