प्रतिनिधी / कोल्हापूर
भुदरगड तालुक्यातील मेघोली धरण फुटल्याने ओढ्याकाठची शेती पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेली आहे. हा ओढा दगड-धोंडड्यांनी भरून गेला आहे. तेच 300 हेक्टरमधील शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱयांच्या मागणीनुसार शेतजमीन पुर्ववत करून देण्यासाठी दीड कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याच्या मंजुरीसाठी विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या दक्षिण कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी मंगळवारी दिली.
मेघोली धरण फुटल्याने ओढ्याकाठची शेतीसाठी सुयोग्य असलेली जमीन पाण्याच्या प्रवाहाने खरवडून गेली आहे. तसेच ओढा दगड-धोंडड्यांनी भरून गेला आहे. धरणाच्या लाभक्षेत्रातील मेघोली, नवले, तळकरवाडी, वेंगरूळ, ममदापूर, सोनुर्ली गावांच्या क्षेत्रातील 300 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. ही जमीन कसण्यायोग्य करण्यासाठी सपाटीकरण करून द्यावे, अशी मागणी आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची आहे. तसेच दगड धोंडड्यांनी भरलेल्या ओढ्याची सफाई करून पात्र पुर्ववत करून पाणी अडवून देण्याची मागणीही आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांनी जलसंपदामंत्र्यांकडे यासंदर्भात पाठपुरावा केला आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या सुचनेनुसार पाटबंधारे दक्षिण विभाग सक्रीय झाला आहे.
मेघोली ओढ्याच्या साफसफाईसाठी तो पुर्ववत करण्यासाठी 65 लाखांची गरज आहे. तसेच शेतीच्या सपाटीकरणासाठी सुमारे 80 लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार या दोन्हीसाठी 1.45 कोटी रूपयांचा सादर केला आहे. हे काम यांत्रिकी विभाग करणार आहे. खर्चात बचत करण्यासाठी पाटबंधारे विभाग प्रयत्नशील आहे. मेघोली धरण दुरूस्तीसाठी 1.5 कोटी, फये धरण दुरूस्तीसाठी 1.90 कोटींची तरतूद केली होती. ही धरण दुरूस्तीची कामे या हंगामात होण्याचे नियोजन होते. आता मेघोली दुर्घटना घडली आहे. पण मेघोलीपेक्षा जास्त गळती असलेल्या फये प्रकल्पाची दुरूस्ती हाती घेण्यात येणार आहे.
फये धरणात 100 टक्के पाणी साठ्यामुळे होणारी वाढती गळती कमी करण्यासाठी या प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. या धरणात सध्या 70 टक्के पाणीसाठा आहे. यासंदर्भात प्रकल्पांतर्गत लाभक्षेत्रातील फये, कोळवण, गिरगाव, हेदवडे, भाटीवडे, पाळेवाडी गावांतील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. कोळवण येथे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत पाटबंधारे विभागाने बैठक घेतली. या बैठकीत पाणीसाठा कमी करणे आणि फये धरणाच्या दुरूस्तीसंदर्भात माहिती देण्यात आली. सर्व ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे धरणाच्या दुरूस्ती, गळतीवरील उपाययोजनांसाठी पाटबंधारे विभाग सक्रीय झाल्याची माहिती स्मिता माने यांनी दिली.