प्रतिनिधी / सातारा
वाई तालुक्यातील मेणवली गावाला इतिहास आहे. पुणे येथून येऊन नाना फडणवीस यांनी मेणवलीला वाडा बांधला होता. त्या वाड्याचे नूतनीकरण गेल्या दीड वर्षेपासून मेणवलीकर फडणवीस कुटूंबियांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे आता हा वाडा जणू पहातच रहावा वाटत आहे. नुकतेच जिल्हा प्रशासनाने पर्यंटाकाना प्रेक्षणीय, इतिहासाकालीन स्थळे खुली केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मेणवली येथील वाडा ही येणाऱ्या पर्यटकांची काळजी घेऊन खुला करण्यात आला आहे.
या वाड्याची नूतनीकरण केल्यामुळे वाड्यातले कारंजे, गणपती मूर्ती, नाना फडणवीस यांच्या बसण्याचे ठिकाण, वाड्यावरील बुरुज, मुख्य दरवाजा पाहण्यासारखा असून अगदी आतमध्ये स्वच्छता आणि टापटीपपणा आहे. कोरीव लाकडी काम पुन्हा संवर्धन करण्यात आले आहे. ऐतिहासिक वारसा जतन करूया, अशी माहिती नाना फडणवीस यांचे वंशज नितीन मेणवलीकर-फडणवीस यांनी दिली. येणाऱ्या पर्यटकांना दिली जाणारी पावतीवर त्यांचे नाव मोडी लिपीतून दिले जाते. यातून मोडी लिपीचा प्रसार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.