कृष्णा महापूर नागरी कृती समिती अहवाल सुपुर्त करणार
प्रतिनिधी / सांगली
मेधा पाटकर शनिवारी 25 रोजी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा महापूर नागरी कृती समितीची सकाळी ११ वाजता माधवनगर विश्रामधाम, येथे बैठक आयोजित केली आहे. कृष्णा महापुराचा अंतिम अहवाल समितीने तयार केला आहे. तो त्यांना देण्यात येणार आहे. सांगली,कोल्हापूर तसेच सातारा येथील तीन जिल्ह्यातील प्रतिनिधी सोबत बैठक होणार आहे. या वेळी ‘कृष्णा खोरे महापुराने’ कृष्णा काठावरील लोक भयभीत झाले आहेत. हाताशी आलेले पीक-शेती उध्वस्त झाली. घरातील प्रापंचिक साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कित्येक जनावरे दगावली, हे नुकसान न भरून येणारे आहे.त्यात मिळणारी शासनाची तोकडी मदत,ती सुद्धा वेळेवर नाही, अजूनही बरेच जणांना ही मदत मिळाली नाही. या बाबत नागरिकांच्या शंका व तक्रारी असतील तर त्या दि. २४ तारखेपर्यंत समितीकडे द्यावे तसेच कृष्णा महापूर बाबत कारणे उपाय योजना असतील तर त्या सुद्धा द्यावेत असे आवाहन समिती निमंत्रक सर्जेराव पाटील यांनी केले आहे.
कृष्णा महापूर नागरी कृती समिती यांनी कृष्णा तसेच वारणा,पंचगंगा या नद्यांचा प्रत्यक्ष दोन वर्षे सखोल अभ्यास करताना पूर रेषा, धरणातील पाणी साठा,नदी काठावरील बांधकाम अडथळे, काही पुलांचे अडथळे, कोप बंधार्यातील न काढलेले बरगे, पात्रातील पाण्याची क्षमता, पावसाच्या नोंदी, हवामान खात्याचा अभ्यास, होणारी ढग फुटी, आपत्ती व्यवस्थापनातील मदत, धरणातून होणारे परिचलन, नदी पत्रातील गाळ, वेगवेगळ्या भागात कमीजास्त पडणारा पाऊस, काठावरील अतिक्रमणे, नियमित न होणारे जलसंधारणाची कामे, हव्यासापोठी केलेले धरणातील पाणीसाठा, पाठ्बंधार अधिकारी या सर्वांचा अभ्यास दौरा करून केलेला अहवाल तयार झाला आहे. त्या अहवालाची राज्य शासन तसेच केंद्र सरकार यांनी दखल घ्यावी या साठी मेधाताई पाटकर या प्रयत्न करणार आहेत.
या समिती मधे प्रामुख्यानी कृष्णा खोऱ्यातील तज्ञ अभ्यासू लोकांनी चांगल्या सूचना केल्या आहेत, तसेच ग्रामपंचायती यांचे सोबत बैठका घेऊन तसे ठराव ग्रामपंचायतीनी केल्या आहेत,अजूनही काही ग्रामपंचायती सोबत बैठकी होणार आहेत, त्यात काही ग्रामपंचायतीनी केंद्राच्या धरण क्षमतेचे मार्गदर्शक तत्वाचे पालन न झाल्यास मायनर कर सुद्धा न भरण्याचा ठराव करण्यात आला आहे. नागरी सामितीने सुचवलेल्या सूचना तसेच उपाय योजना याचे पालन जर झाले नाही, तर भविष्यात आंदोलाना शिवाय पर्याय उरणार नाही.पावसाळा काही महीण्यावर आला असताना या वर कोणत्याही उपाय योजनाकडे लक्ष दिले नाही. उपाय योजनासाठी वेळ कमी आहे. महापूर येऊ नये म्हणून लवकर होणारे उपाय केले पाहिजेत, बीन खर्चाचे तसेच काही प्रदीर्घ खर्चाचे चालणार्या उपाय योजना या समितीने सुचवल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन केले जाते का नाही या वर समिती लक्ष ठेवून असणार आहे.
तसेच पाण्याची आकडेवारी होणारा पाऊसमान,धरणातील साठा,पाण्याचा वेग, हवामानाचा अंदाज हे सर्व या साठी संगणक प्रणालीतून वेब बेस सॉफ्टवेअर यातून येणारे पुराचे अचूक वेध घेण्यासाठी उपयोगी पडणार आहे. त्यात दहा वर्षाचा डेटा अपडेट चे काम सध्या सुरु आहे.शासनाला याची खूप मदत होणार आहे. यावेळी मेधाताई पाटकर सोबत या बैठकीत सामितीतील विजयकुमार दिवाण, डॉ.रवींद्र होरा, प्रमोद चौगुले, हणमंतराव पवार, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सर्जेराव पाटील, सुकुमार पाटील, संजय कोरे, उदय गायकवाड (कोल्हापूर), कृष्णा महापूर नागरी कृती समितीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.