नाम गुम जाएगा, चेहरा यह बदल जाएगा, मेरी आवाज ही पहचान है, गर याद रहे।
कधी कानावर पडते तेव्हा मनाला स्पर्शून जाणारे आणि एकदम भावुक करून सोडणारे हे गाणे आहे ‘किनारा’ या सिनेमातील. शब्द अर्थातच ऑल द ग्रेट गुलजारसाहेबांचे. पंचमदांचे संगीत असलेले हे गाणे आणखीनच अर्थवाही होऊन येते ते भूपिंदरसिंह नामक गहिऱया आणि लता नामक चमत्कार असलेल्या दैवी आवाजात. हे गाणे कुठेही कानावर पडले तरीही ऐकणाऱयाचे कान टवकारले जातात. कारण या गायक मंडळींच्या स्वरमूर्तीच आपण मनःपटलावर साठवलेल्या असतात. असंख्य गाणी, जी आपण ऐकतो ती आपण जणु काही आपल्या मनाच्या डिस्कवर किंवा स्टोअरेजवर कोरून ठेवलेली असतात. जेव्हा ती प्रत्यक्ष कानावर येतात तेव्हा ती स्मृती बटन दाबल्यासारखी एकाएकी जागृत होत असते आणि म्हणूनच गाणे ऐकून संपले तरीही मनातली महफिल संपलेली नसते. किंबहुना ती तेव्हाच तर सुरू होते. मनात साठवलेल्या अनेक सुरांना जाग येते आणि मग तो खेळ सुरूच राहतो. का बरे? कशामुळे सुरू राहतो तो? आणि त्याची किल्ली काय असते? तर ती असते स्वर किंवा आवाज आणि त्याची अद्वितीय म्हणावी अशी ओळख. कोणत्याही कलेला वेगवेगळय़ा रूपात साठवून ठेवण्याची अत्याधुनिक तंत्रज्ञानाने केलेली असली तरी पूर्वी अशा सोयी नसल्याने विसंबून राहायला लागत होते ते ज्याच्या त्याच्या स्मरणशक्तीवर. कदाचित त्यामुळेच असेल पण मन म्हणजे अक्षरशः भांडार झालेले असते आणि इथे गाणी ओळख देतात ती कशाच्या आधारावर तर आवाजाच्या. आवाज हीच तर इथे खरी ओळख असते. ‘मेरी आवाज ही पहचान है’ या साध्याशा वाटणाऱया ओळीत खरी मेख दडलेली आहे ती अशी. अर्थात अशी गाणी रचणे आणि दरवेळी त्या गाण्याच्या सादरीकरणात लपलेले नवीन नवीन अर्थगंध दरवळत येणे हीही गुलजारसाहेबांची खासियत आहे!
गायक कलाकार, अभिनेते, संवादक, सूत्रसंचालक, वृत्तनिवेदक या सगळय़ा सगळय़ा लोकांच्या जगात त्यांचा तो वैशिष्टय़पूर्ण आवाज हीच त्यांची खरी आणि लक्षात राहणारी ओळख असते. आताची गायक मंडळी खूप छान प्रेझेंट करतात स्वतःला स्टेजवर. सुरेल असण्यासोबत सुदर्शन असणे हीही काळाची गरज बनली असावी कदाचित आता. पण खरे सांगा आपली शरयू दाते किंवा त्याहीपुढे जाऊन सई जोशी हिच्यासारख्या गोड मुलींनी एकदा का आकार लावला की आपल्याला झालेला त्यांचे गोड दिसणे न्याहाळण्याचा मोह त्यांच्या सुस्वरकंठापुढे हात टेकतोच की! आवाज ही जालिम गोष्ट आहे खरी! दर्दी मंडळी आवाजावरून कोण गायक ते इतके अचूक ओळखतात की त्यांच्या ओळखण्याला दाद द्यावी! इथे संदर्भ लागतो तो आवाजाचा. मग सदर मंडळी कितीही देखणी असोत, स्वतःला उत्तम प्रकारे सादर करीत असोत, त्यांचे स्वर, पर्यायाने आवाज हीच त्यांना ओळखण्याची खूण असते. सादरकर्त्याने वापरलेली भाषा, त्याची शब्द वापरण्याची पद्धत, त्यातल्या भावभावनांचे रंग या सगळय़ा गोष्टी घडत असतात त्या आवाजाच्या कॅनव्हासवर. कारण गाणे असले की ते आवाज लावणे असते तर नाटकांमध्ये आवाजाची फेक महत्त्वाची असते. सूत्रसंचालनात आवाजाची खोली, बेस फार वेगळी मजा आणतो. एकेका आवाजाचे एकेक वैशिष्टय़ असते. लताबाई किंवा आशाबाई प्रभृतींचे आवाज म्हणजे गंधर्वलोकातून आलेले चमत्कार आहेत. रफीसाहेबांचा, प्रत्येक नटागणिक बदलून त्याचे व्यक्तिमत्त्व गाण्यात उतरवणारा आवाज हे उत्कृष्टतेचं अक्षरशः दीपस्तंभी उदाहरण म्हणावे लागेल. तलत मेहमूदसारख्या जुन्या गायकांचा आवाज म्हणजे रेशमी, तर किशोरदांची गाणी म्हणजे बेस आणि कमालीचा नटखट गोडवा यांची दरवेळी बदलणारी अद्भूत मिश्रणे. येसूदासजी किंवा रवींद्र साठे यांचे आवाज म्हणजे ‘खर्ज’ हा किती वजनदार आणि मिट्ट गोड असावा याच्या सगळय़ा मर्यादा उधळून लावणारे आणि अंगी रोमांच उभे करणारे खडीसाखरेचे देवपुतळेच! हरिहरन यांचा आवाज म्हणजे लवचिकपणा आणि सुस्वरता यांची परमावधी! एकेक स्वर पाणी उभे करतो डोळय़ात. तर शंकर महादेवन यांचा आवाज ऐकल्यावर शिल्पसौंदर्यातली कारागिरी आठवते. राहुल देशपांडेंचा आवाज बऱयाच जणांना त्यांच्या आजोबांच्या आवाजाची आठवण करून देईल तर आनंद गंधर्व उपाख्य आनंद भाटे यांच्या स्वरात हिरेमाणकांचे सौंदर्य आणि कणखरता जाणवेल. जग गाजवणाऱया आणि परतत्त्व जागवणाऱया या दिव्य आवाजांच्या मालकांना जितका मान आणि कीर्ती मिळते तितकाच त्रास तो आवाज घडवण्यासाठी त्यांना काढावा लागलेला असतो. तास न् तास, दिवसानुदिवस, वर्षानुवर्षे रियाझ करावा लागतो. घडय़ाळाकडे न बघता मेहनत करावी लागते. शिकवणाऱयाने दिलेले अमृतकण झेलायला मनाची ओंजळ सदैव पसरलेली लागते.
युरोपियन थिएटरमध्ये पाहिलेल्या एका नाटकात बेसेन्यी फोरेन्स या नटाचा पुलंनी उल्लेख केला आहे. ते म्हणतात की देवळातल्या नगाऱयावर कापडी बोळा असलेली टिपरी मारल्यावर होणाऱया घनगंभीर आवाजासारखा त्या नटाच्या आवाजाचा खर्ज होता. त्या अतिमंद्र नादाने माझी शुद्ध हरपेल की काय असे वाटू लागले. इतका सुंदर आवाज असण्याचे कारण असे होते की ती व्यक्ती म्हणजे तिकडच्या रंगभूमीवरील फार मोठा गायक नट होता. गाण्याशी संबंधित आवाज असल्याने साहजिकच तो म्युझिकल होता. आवाज लावणे हे तुमचे वेगळेपण दाखवते. कारण आवाज लावण्याच्या पद्धतीपासूनच एखाद्या संगीत घराण्याला सुरुवात झालेली असते. ‘अमीन सायानी’ हा फक्त उल्लेख पुरेसा आहे. या जादूगाराने रेडिओवरील चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून किती पिढय़ांना भूल पाडली आहे हे सांगणे नलगे! नुकत्याच दिवंगत झालेल्या आशालता वाबगावकर यांचा बोलता आणि गाता असा दोन्ही प्रकारचा आवाज अतीव मिठ्ठास होता.
आवाज या विषयावर अभ्यासू लोकांनी इतका विचार केला आहे की त्यातून आवाज साधना शास्त्र उदयाला आले. आत्ताच्या काळातील लोकांनी कित्येक कलाकारांना जुन्या रेकॉर्डिंगवरच ऐकले आहे. पण ते आवाज ऐकल्यावर बराच काळ दुसरे काही ऐकू नये असे वाटते. कारण ते तसे आहेत. खरोखरच या माणसांचे या रेकॉर्डिंगखेरीजचे अस्तित्त्व फक्त त्यांच्याविषयी केलेल्या लेखनातून आणि आठवणींतूनच उरले आहे. परमेश्वराने दिलेला कंठ धन्य करणारे अनेक कलाकार जन्माला येतात. मनसोक्त आनंद देतात आणि निघूनही जातात. पण त्यांचा आवाज आजही जगात शिल्लक आहे. कित्येकदा आपल्याला कोणाचा आवाज हे माहीत नसते पण आपण भारून जाऊन ऐकतो. लौकिकार्थाने कुरूप माणूसही लक्षात राहू शकतो तो त्याच्या आवाजामुळे. आवाज म्हणजे कलाकारांची जिवंत गुंतवणूक आहे. म्हणूनच नाव विस्मृतीत हरवले, वयामुळे चेहरा बदलला तरी आवाजातली ओळख मात्र बदलत नाही. नाम गुम जाएगा ऐकल्यावर हेच मनात येत राहते!
– अपर्णा परांजपे-प्रभु