ऑनलाईन टीम/तरुण भरत
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. दुसरीकडे, मुफ्तींच्या या वक्तव्यावरून शिवसेना केंद्रातीली सत्ताधारी भाजपावर निशाणा साधत आहे. मेहबुबा मुफ्ती आज जे काही बोलत आहेत त्याला भाजपाच जबाबदार असल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले आहेत. अफजल गुरू आणि बुरहान वानी या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यानंतरही भाजपाने पीडीपीसोबत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते. असंही संजय राऊत यांनी बोलून दाखवलं आहे.
काश्मीर प्रश्नावर भाजपची मते काहीही असली तरी शिवसेना त्याला नेहमीचं विरोध करेल. मेहबुबा मुफ्ती यांचा पक्ष भाजपचा खास मित्र राहिला आहे. मुफ्ती हे नेहमीच पाकिस्तान समर्थक राहिले आहेत, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर हा एक वाद आहे. गेल्या 70 वर्षांपासून हा वाद सुरू आहे. पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरमधील लोकांशी चर्चा झाल्यावरचं हा वाद सोडवला जाईल, असं मेहबूबा यांनी म्हटलं होतं. या विधानानंतर विरोधी पक्षांकडून सातत्याने भाजपवर टीका केली जात आहे.