ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने घरातच नजरकैद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणावरून मुफ्ती यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला आहे.
मुफ्ती म्हणाल्या, भारत सरकारला अफगाणिस्तानातील लोकांच्या अधिकारांची चिंता आहे, परंतु काश्मिरींची पर्वा नाही. काश्मीरमधील परिस्थितीचा हवाला देत मला आज नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे काश्मीरमधील परिस्थिती सामान्य असल्याचे सरकारचे दावे खोटे ठरत असल्याचेही मुफ्ती यांनी सांगितले.
दरम्यान, गिलानी यांच्या मृत्यूनंतर लादलेले निर्बंध आता शिथिल करण्यात आले आहेत. काश्मीर आणि जम्मू या दोन्ही विभागांमध्ये परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे, परंतु कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.